‘केंद्र सरकारनं नाटकबाजी थांबवावी’, राजू शेट्टींचा हल्लाबोल, छगन भूजबळही आक्रमक

| Updated on: Jan 26, 2021 | 6:54 PM

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. तसेच केंद्र सरकारने नाटकबाजी थांबवावी आणि कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी केली.

केंद्र सरकारनं नाटकबाजी थांबवावी, राजू शेट्टींचा हल्लाबोल, छगन भूजबळही आक्रमक
Follow us on

मुंबई : देशाची राजधानी दिल्लीतील शेतकरी आंदोलन चिघळलं आहे. मोदी सरकारने नवे कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी आंदोलकांकडून केली जातेय. आज (26 जानेवारी) प्रजासत्ताक दिनी काही आक्रमक आंदोलकांनी लाल किल्ल्यावरही चढाई केली. काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली, तर काही ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रु धुराच्या नळकांड्यांचाही वापर केला. यावर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्यात. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. तसेच केंद्र सरकारने नाटकबाजी थांबवावी आणि कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही आक्रमक पवित्रा घेतला (Raju Shetti and Chhagan Bhujbal comment on Delhi Farmer Tractor Rally against Farm Laws).

राजू शेट्टी म्हणाले, “गेल्या 2 महिन्यांपासून दिल्लीत कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा अंत होऊ शकतो. केंद्र सरकारनं नाटकबाजी थांबवावी. शेतकऱ्यांच्या आंदोलनाने हिंसक वळण घ्यावं अशी केंद्र सरकारची योजना आहे का? केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये अशी माणसे घुसवली आहेत की त्यामुळे शेतकरी बिथरला पाहिजे. त्यामुळे आंदोलन हिंसक व्हावं अशी इच्छा सरकारची आहे का? शेतकर्‍यांबद्दल खोट्या बातम्या द्यायच्या, लाल किल्ल्यावर तिरंगा काढून शेतकऱ्यांचा झेंडा लावायचा हा सगळा डाव सरकारचा आहे. सरकार शेतकऱ्याला बदनाम करण्याचे काम करत आहे. सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, नाहीतर यापेक्षा जास्त उद्रेक पाहायला मिळेल. या सर्वांना मोदी सरकार जबाबदार आहेत.

छगन भुजबळ म्हणाले, “शेतकरी आंदोलनावर एकच मार्ग आहे. देशाच्या प्रमुखाने बोललं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांप्रमाणे कायद्याचा फेर विचार केला पाहिजे. हा केवळ शेतकऱ्यांचा प्रश्न नाही. पंजाब हरियाणातील लोकांमुळे आपल्याला धान्य मिळतं. पंजाब हरियाणातील लोक सीमेवर जीव मुठीत धरून आपलं रक्षण करत आहेत. जास्त अंत न बघता प्रधानमंत्र्यांनी यात लक्ष घातलं पाहिजे.”

संबंधित बातम्या :

Delhi Farmers Tractor Rally : शेतकरी आंदोलन चिघळलं, दिल्लीत काय काय बंद?

Tractor March: डीडीयू रस्त्यावर ट्रॅक्टर उलटला, चालक आंदोलकाचा मृत्यू

मोठी बातमी: शेतकऱ्यांच्या उद्रेकानंतर दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद; गृहमंत्रालयाचे आदेश

संबंधित व्हिडीओ :

Raju Shetti and Chhagan Bhujbal comment on Delhi Farmer Tractor Rally against Farm Laws