शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडलेले 6 मुद्दे

| Updated on: Aug 20, 2019 | 5:41 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची भेट घेतली.

शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडलेले 6 मुद्दे
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. पवारांनी (Sharad Pawar) पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील कराडमध्ये पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. अनेकांची घरं पडली आहेत, शेती उद्ध्वस्त झाली आहे. शरद पवारांनी स्वत: या भागात जाऊन पाहणी केली होती. त्यानंतर पवारांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन माहिती दिली.

शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडलेले मुद्दे

  1. कोल्हापूर, सांगली, सातारा येथे शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. यामध्ये सोयाबीन, ऊस, भाजीपाला यांचा समावेश आहे.
  2. ऊसाच्या उंचीच्या वर पाणी असल्याने त्याचे नुकसान झाले आहे. अनेक क्षेत्रातील ऊस कुजण्याची शक्यता आहे. यात सरकारने  कर्जमाफी  करण्याचे धोरण जाहीर केले. मात्र यात वाढ करुन 1 लाख रुपयाचे साहाय्य सरकारने द्यावे.
  3. पूरग्रस्त भागातील जमिनीला भेगा गेल्या असून हे नीट करण्याकडे आपण लक्ष घालावे.
  4. घरांचेदेखील नुकसान मोठे झाले आहे. यात गोरगरीब मागासवर्गीयांची घरे मातीची असल्याने ती बांधण्याचा कार्यक्रम असा घ्यावा जो टिकाऊ राहील.
  5. कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पशुधन वाहून गेले आहे. यासंबंधीचा निर्णय घेणे गरजेचे आहे. याशिवाय गावातील मुलभूत गोष्टींचा विचार करावा.
  6. सातारा, सांगली, कोल्हापूरसह  कोकण आणि पालघर जिल्ह्यातदेखील अनेक नुकसन झाले. याकडे आपण आचारसंहिता जाहीर होण्याआधी उपाययोजना करावी, अशा मागण्या करण्यात आल्या.

पूरग्रस्तांचं पीककर्ज माफ

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेऊन पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतीची माहिती दिली. यानुसार पूरग्रस्तांचं 1 हेक्टरवरील पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. शिवाय पडलेली घरं बांधून देण्यात येणार आहेत. बाधीत कुटुंबांना तीन महीने गहू आणि तांदूळ मोफत, तात्पुरत्या निवासासाठी ग्रामीण, शहरी भागात अनुक्रमे 24 आणि 36 हजार रुपये, घर बांधकामासाठी प्रत्येकी पाच ब्रास वाळू आणि मुरूम मोफत देणार, कृषी पंपाच्या वीज बिलाची वसुली तीन महिने स्थगित, जनावरांच्या गोठ्यांच्या नुकसान भरपाईपोटी अर्थसहाय्य, छोट्या व्यावसायिकांना 50 हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई, अशी मदत देण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या  

पूरग्रस्तांचं कर्ज माफ, 36 हजार घर भाडं, मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा 

शरद पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, पूरग्रस्तांच्या मदतीची आयडिया देणार