‘तौत्के’चा तडाखा, देवेंद्र फडणवीसांचा 2 दिवसीय कोकण दौरा, पंतप्रधान मोदीही हवाई पाहणी करण्याची शक्यता

| Updated on: May 18, 2021 | 7:03 PM

देवेंद्र फडणवीस उद्या ते रायगड जिल्ह्यात झालेल्या नुकसानाची पाहणी करतील. तर परवा रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत.

तौत्केचा तडाखा, देवेंद्र फडणवीसांचा 2 दिवसीय कोकण दौरा, पंतप्रधान मोदीही हवाई पाहणी करण्याची शक्यता
देवेंद्र फडणवीस दोन दिवसाचा कोकण दौरा करणार, मोदीही हवाई पाहणी करण्याची शक्यता
Follow us on

मुंबई : तौत्के चक्रीवादळानं कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिलाय. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागात आणि संपूर्ण जिल्ह्यात वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस 2 दिवसांचा दौरा करणार आहेत. उद्या आणि परवा असा 2 दिवस फडणवीसांचा पाहणी दौरा असणार आहे. त्यात उद्या ते रायगड जिल्ह्यात झालेल्या नुकसानाची पाहणी करतील. तर परवा रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदीही येत्या दोन दिवसांत नुकसानग्रस्त भागाची हवाई पाहणी करण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. (Devendra Fadnavis will inspect the damage caused by the cyclone in Konkan)

तत्पूर्वी, देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे नुकसानग्रस्तांच्या मदतीची मागणी केली आहे. गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. तेव्हाही फडणवीसांनी कोकण दौरा करत नुकसानाची पाहणी केली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोकणाचा दौरा केला होता. तेव्हा ठाकरे यांनी नुकसानग्रस्तांसाठी मदतीची घोषणा केली होती. मात्र, ‘गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळ आल्यावर राज्य सरकारने जी मदत जाहीर केली, ती एकतर तोकडी होती आणि तीही मिळाली नाही. तौक्ते वादळानंतर नुकसानीचा अंदाज घेऊन राज्य सरकारने भक्कमपणे जनतेच्या पाठिशी उभे रहायला हवे!’, असं ट्वीट करत फडणवीस यांनी राज्य सरकारकडे नुकसानग्रस्तांच्या मदतीची मागणी केलीय.

रत्नागिरी जिल्ह्यातील घरांचे नुकसान

मंडणगड तालुक्यात 200 घरांचे, दापोली तालुक्यात 350, खेड तालुक्यात 30, गुहागर 05, चिपळूण 65, संगमेश्वर 102, रत्नागिरी 200, राजापूर 32 असे मिळून एकूण 1 हजार 28 घरांचं नुकसान झालंय. तर रत्नागिरीमध्ये 1, लांजामध्ये 1 आणि राजापूरमध्ये 05 असे एकूण 07 गोठ्यांचे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळामध्ये गुहागरमध्ये 1, संगमेश्वरात 1, रत्नागिरीमध्ये 03 आणि राजापूरमध्ये 03 असे एकूण 08 नागरिक जखमी झाले. गुहागरमध्ये 1 बैल, संगमेश्वरात 01 बैल आणि रत्नागिरीमध्ये 2 शेळ्या असे 4 पशुधन मृत झाले आहेत. जिल्ह्यामध्ये 450 झाडांची पडझड झाली असून 14 दुकाने व टपऱ्या, 09 शाळा, तर 21 शासकीय इमारतींचे नुकसान झालं आहे.

सिंधुदुर्गला सर्वाधिक फटका

तौत्के चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसल्याचं पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्ग, मुख्य रस्ते आणि रेल्वे सेवा बंद आहे. वादळामुळे जवळपास 80 टक्के विजेचे खांब कोसळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वीज सेवा खंडीत झाली आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मोबाईल टॉवरही कोसळले आहेत. त्यामुळे मोबाईल सेवाही विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय. अशावेळी प्रशासनाने आधीच खबरदारी घेत कोरोना रुग्णांसाठी योग्य उपाययोजना केल्याचं दिसून आलं आहे. चक्रीवादळाचा इशारा आधीच मिळाल्यामुळे प्रशासनाने कोविड रुग्णांसाठी योग्य ती खबरदारी घेतली होती. वीज गेली तर कोरोना रुग्णांच्या जीवितास धोका होऊ नये यासाठी कोविड रुग्णालयांमध्ये जनरेटरची सुविधा करण्यात आली होती. त्यामुळे वादळाच्या तडाख्यात बत्ती गुल झाली असली तरी कोरोना रुग्णालयातील वीज सुरु आहे.

संबंधित बातम्या :

Photo Story: ‘तौक्ते’चा तडाखा, मुंबईत दोन तासात 132 झाडे पडली, सी-लिंक बंद; विमानांचे उड्डाणही थांबवले

VIDEO | सोसाट्याच्या वाऱ्याने झाड घरावर पडलं, जिगरबाज आजोबांनी घाव झेलत नातवाला वाचवलं

Devendra Fadnavis will inspect the damage caused by the cyclone in Konkan