सर्वसामान्यांसाठी खुशखबर; डाळींचे भाव पुन्हा घसरले, चणा डाळ 60, तूर डाळ 90 रुपये किलो

| Updated on: Nov 18, 2020 | 5:04 PM

मुंबई एपीएमसी धान्य मार्केटमध्ये डाळींचे भाव पुन्हा घसरु लागले आहेत. किराणा मालाचे भाव स्थिर असून डाळींचे दर उतरले आहेत.

सर्वसामान्यांसाठी खुशखबर; डाळींचे भाव पुन्हा घसरले, चणा डाळ 60, तूर डाळ 90 रुपये किलो
Follow us on

नवी मुंबई : मागील काही दिवसांपासून डाळींच्या भावाने उच्चांक पातळी गाठली होती (Tur Dal And Other Pulses Price Decline). त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवशी सर्वसामान्यांची झोप उडाली होती. मात्र, सर्वसामान्यांसाठी एक खुशखबर आहे. मुंबई एपीएमसी (Mumbai APMC) धान्य मार्केटमध्ये डाळींचे भाव पुन्हा घसरु लागले आहेत. किराणा मालाचे भाव स्थिर असून डाळींचे दर उतरले आहेत (Tur Dal And Other Pulses Price Decline).

देशात डाळ निर्मितीमध्ये जळगावचा वाटा हा मोठा आहे. तर येथे तयार झालेली डाळ ही देशातील विविध भागांसह विदेशातही निर्यात केली जाते. त्यामुळे या सर्व कडधान्याच्या उत्पादनाचा एकूणच परिणाम हा जळगावच्या बाजारपेठेवर होत असतो. सध्या महाराष्ट्रासह, राजस्थान, मध्यप्रदेश यांसारख्या भागातून मोठ्या प्रमाणात कच्चा माल येत असल्याने डाळींचे उत्पादन वाढत आहे. तसेच, डाळींचे भाव कमी होण्यासदेखील मदत होत आहे.

तूर डाळीची वाढलेली आवक आणि हरभरा डाळीला मागणी नसल्याने पंधरा दिवसांत तिन्ही डाळींच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे दिवाळी पासून नवीन वर्षापर्यंत घरोघरी शिजणारी पुरणपोळीची चव गोड झाली आहे. सण आणि उत्सव सुरु झाल्यानंतर बाजारात ग्राहकांची वर्दळ असते. मात्र, ग्राहकही गरजेनुसार वस्तूंची खरेदी करीत असल्याने डाळींची मागणी कमी झाली. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या महिन्यात डाळीच्या दरात विक्रमी भाव वाढ झाल्याने तूरडाळ 100 ते 120 रुपये, मूगडाळ 120 ते 140 किलोवर तर हरभरा डाळ 85 ते 95 रुपये किलोवर पोहोचली होती. ऐन सणासुदीत भाववाढ झाल्याने तिन्ही डाळी खरेदी करण्यासाठी अधिक खिसा हलका करावा लागणार होता. तुरीच्या आयातीसाठी दालमिलला केंद्र सरकारतर्फे देण्यात येणारे परवाने कोरोना काळात तीन महिने थांबवून ठेवल्याने बाजारात तूर डाळीचा तुटवडा निर्माण झाला.

पुरवठा आणि मागणीत बरीच तफावत निर्माण झाल्याने भाववाढ झाली होती. भाववाढीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने तुरीची आयात आणि नाफेडच्या साठ्यातून 3.6 लाख टन तूर खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तुरीच्या भावात प्रतिकिलो 25 रुपयांची घसरण होऊन भाव 9,500 रुपयांवर स्थिरावले. पंधरा दिवसांत तूर डाळ प्रतिकिलो 25 ते 30 रुपयांनी घसरली. तसेच 120 ते 140 रुपये किलो विकली जाणारी मूगडाळ आता 90 ते 95 रुपये प्रतिकिलो विकली जात आहे.

सरकार तीन लाख तुरीच्या आयातीसाठी परवाने जारी करणार आहे. परवाने जारी केल्यानंतर आयातीसाठी जवळपास दीड ते दोन महिने लागतील. डिसेंबरअखेर नवीन तूर बाजारात येईल. सरकारच्या निर्णयानंतर भाववाढीवर लगाम लागला. दीड महिन्यात हरभरा डाळीचे भाव क्विटंलमागे 2 हजार रुपयांनी वाढून 75 ते 80 रुपये किलोवर पोहोचले.

मात्र, बाजारात ग्राहकांचा अभाव असल्याने हरभरा डाळीच्या दरात प्रतिकिलो 85 रुपयांवरुन 60-65 रुपयांपर्यंत घसरण झाली. आयातील प्रोत्साहन देण्यासाठी आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळेही दोन्ही डाळींच्या दरात घसरण झाली. दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवसांत डाळीच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांचे चेहरे फुलले आहेत. परिणामी, गरिबांच्या घरी वरण आणि पुरणाची पोळी शिजणार हे नक्की. त्यामुळे आता सर्वसामान्यांना नागरिकांना चिंता करण्याची काही गरज नाही अशी माहिती डाळीचे व्यापारी हर्ष ठक्कर यांनी दिली आहे.

Tur Dal And Other Pulses Price Decline

संबंधित बातम्या :

गृहिणींचे बजेट कोलमडले, ऐन सणासूदीत डाळींचे भाव गगनाला, तूर डाळ 120 रुपये किलो