मुंबईत पाण्यात खेळताना शॉक लागून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

| Updated on: Jun 11, 2019 | 7:54 AM

पहिल्या पावसामुळे कांदिवलीतील पोईसर येथे राहणारे ओझा आणि तिवारी कुटुंबीयांवर शोककळा ओढवली.

मुंबईत पाण्यात खेळताना शॉक लागून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
Follow us on

मुंबई : मुंबईमध्ये सोमवारी रात्री पावसाने जोर धरला आणि मुंबईकरांना उन्हाच्या चटक्यानपासून आराम मिळाला. मात्र या पावसामुळे कांदिवलीतील पोईसर येथे राहणारे ओझा आणि तिवारी कुटुंबीयांवर शोककळा ओढवली. पाण्यात खेळणाऱ्या दोन चिमुकल्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला.

नेमकी काय घटना घडली?

मुंबई आणि मुंबईच्या इतर भागात सोमवारी चांगला पाऊस पडला. याच पावसाचा आनंद घेण्यासाठी पोईसर येथे राहणाऱ्या तुषार झा (वय 11 वर्षे) आणि रिषभ तिवारी (वय 10 वर्षे) हे पावसात भिजण्यासाठी घराच्या बाहेर आले. कालच्या पावसामुळे चाळीत एक फूटापर्यंत पाणी साचलं होतं. त्यात घराच्या बाहेर असलेल्या लोखंडी शिडीच्या बाजूने इलेक्ट्रिक वायर गेली होती. त्या वायरचा करंट लोखंडी शिडीमध्ये पास झाला. त्या शिडीला दोन्ही चिमुकल्यांनी स्पर्श करताच त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला.

दोन्ही चिमुकल्यांना तातडीने हॉस्पिटलला हलवण्यात आले. मात्र, दोन्ही चिमुकल्यांचा जीव गेल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर ओझा आणि तिवरी कुटुंबीयांसोबत अवघ्या कांदिवलीत शोककळा पसरली.

पुण्यातही दोन चिमुकल्यांचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ असलेल्या ओतूर परिसरातील डोमेवाडी येथे अशीच हृदयद्रावक घटना घडली. वादळी वाऱ्यासह पाऊसाने संपूर्ण घर कोसळून भिंतीच्या ढिगाऱ्याखाली गाडून दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला. तसेच, एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेवर आळे फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वैष्णवी भुतांबरे (वय 6 वर्षे) आणि कार्तिक केदार (वय 2 वर्षे) या दोन चिमुकल्यांचा दुर्देवी अंत झाला आहे. तर चिमाबाई केदार (वय 70 वर्षे) या जखमी झाल्या आहेत.

दुपारी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास कार्तिक आणि वैष्णवी ही घरासमोरील अंगणात खेळत असताना अचानकपणे वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. त्यावेळेस पाऊस सुरू झाल्याने दोघेही जवळ असलेल्या घरात पावसापासून बचाव करण्यासाठी गेले असता, त्याच वेळी जोरदार सुटलेला वादळी वारा आणि पावसामुळे संपूर्ण घर कोसळलं. यात वैष्णवी आणि कार्तिक या चिमुकल्यांचा मृत्यू झाला.