युतीचं सरकार येणार म्हणताच फडणवीसांकडून सर्वाधिक टाळ्या, उद्धव ठाकरेंच्या कोपरखळ्या

| Updated on: Sep 07, 2019 | 3:18 PM

युतीचंच सरकार येणार, असं म्हटल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सर्वाधिक टाळ्या वाजवल्या. मीसुद्धा नरेंद्र मोदींसमोर त्यांच्याकडून टाळ्या वाजवून घेतल्या आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी हशा पिकवला

युतीचं सरकार येणार म्हणताच फडणवीसांकडून सर्वाधिक टाळ्या, उद्धव ठाकरेंच्या कोपरखळ्या
Follow us on

मुंबई : येणार तर युतीचंच सरकार, असं म्हटल्यावर सर्वाधिक टाळ्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी वाजवल्या आहेत. आणि मीसुद्धा नरेंद्र मोदींसमोर (PM Narendra Modi) त्यांच्याकडून (फडणवीस) सर्वाधिक टाळ्या वाजवून घेतल्या आहेत, अशा कोपरखळ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लगावल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेल्या मेट्रो प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, रेल्वेमंत्री पियुष गोयल, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, आशिष शेलार, राहुल शेवाळे, मनोज कोटक यासारखे नेते उपस्थित होते.

पंतप्रधानांना मी प्रश्न विचारला किती गोष्टींसाठी आपलं अभिनंदन करु? याच ठिकाणी प्रचारसभा झाली होती, तेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं होतं की काश्मीरमधील कलम 370 रद्द करु. विरोधक सांगत होते, की 370 हटवणार नाही. मात्र मोदींनी ते प्रत्यक्षात आणलं, याचा मला अभिमान आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

चंद्राला गवसणी घालण्याचं विकासाचं स्वप्न साकार केलं. अयोध्येत राम मंदिर उभाराल, समान नागरी कायदा आणाल, याची मला खात्री आहे. अस्मिता आणि अभिमानाचे विषय सक्षमपणे हाताळत आहात, याबद्दल उद्धव ठाकरेंनी मोदींचं अभिनंदन केलं.

नुसत्या घरातल्या घरात उठाबशा काढून, बेडक्या फुगवून दाखवायच्या नाही आहेत. ही ताकद योग्य ठिकाणी वापरली पाहिजे.
नरेंद्र मोदी यांच्या रुपाने विकासाला दिशा देणारं नेतृत्व मिळालं आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांवर स्तुतिसुमनं उधळली. लोकसंख्या वाढत असून त्यांना सुविधा देत राहिल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांचे आभार व्यक्त केले.

येणार तर युतीचंच सरकार, असं म्हटल्यावर सर्वाधिक टाळ्या देवेंद्र फडणवीस यांनी वाजवल्या आहेत. आणि मीसुद्धा नरेंद्र मोदींसमोर त्यांच्याकडून सर्वाधिक टाळ्या वाजवून घेतल्या आहेत. युती आहे आणि करायचं तर दिलखुलासपणे. आम्हाला सत्ता हवी आहे, पण सत्तेची हाव नाही, तर राज्याचा विकास करण्यासाठी हवी. एक चांगल सरकार मित्रपक्षांसह हवं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.