विशाखा समितीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्क फोर्स नेमणार, महिला व बालविकास मंत्र्यांची घोषणा

| Updated on: Apr 01, 2021 | 3:17 AM

राज्यात विशाखा समितीच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी टास्क फोर्स नेमणार असल्याची घोषणा यशोमती ठाकूर यांनी केलीय.

विशाखा समितीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्क फोर्स नेमणार, महिला व बालविकास मंत्र्यांची घोषणा
महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर
Follow us on

मुंबई : “राज्यातील सर्व नोंदणीकृत आस्थापना, कारखाने, कंपनी, संघटित असंटित क्षेत्रामध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ केल्याच्या घटना घडतात. या छळापासून संरक्षण व्हावे, यासाठी आलेल्या तक्रारींची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व विभागांनी नियमानुसार उचित कार्यवाही करावी,” असे निर्देश महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी त्यांनी विशाखा समितीच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी टास्क फोर्स नेमणार असल्याचे जाहीर केले. कामाच्या ठिकाणी महिलांची छळवणूक, अत्याचार रोखण्यासाठी असलेल्या विशाखा समितीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आज (31 मार्च) बैठक झाली. यावेळी ठाकूर बोलत होत्या (Yashomati Thakur on crime against women and Vishakha Committee in offices).

तक्रारींची चौकशी करण्यासाठी सर्व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्तरावर तक्रार समिती गठित करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यांचे उपजिल्हाधिकारी यांनी या नियोजनासाठी एक समन्वय अधिकारी निवडावा व त्यांच्या कार्यक्षेत्रातील लैंगिक छळाच्या तक्रारी प्राप्त करुन संबंधित स्थानिक तक्रार समितीकडे पाठवाव्यात. याबाबतचा अहवाल संबंधित जिल्हाधिकारी यांना सादर करुन त्यांनी तो अहवाल महिला व बालविकास विभागास प्रत्येक वर्षाच्या 30 एप्रिलपूर्वी सादर करावा, अशी तरतूद नियमानुसार आहे. याबाबतची सर्व कार्यवाही नियमानुसार करावी, असे निर्देशही ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीत दिले.

‘विशाखा समिती नेमणे अनिवार्य, महिलांना न्याय मिळावा म्हणून कठोर पावलं उचलणार’

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 अंतर्गत विशाखा समिती नेमणे अनिवार्य आहे. शासकीय तसेच खासगी कार्यालयात विशाखा समितीच्या माध्यमातून महिलांना न्याय मिळावा यासाठी कठोर पावले उचलावी. तसेच अमंलबजावणी करिता टास्क फोर्स स्थापन करण्यात यावा, असेही निर्देश यावेळी यशोमती ठाकूर यांनी दिले. यावेळी प्रधान सचिव आय ए कुंदन, कामगार विभागाच्या सचिव विनिता वेद तसेच सामान्य प्रशासन, उद्योग, उर्जा,सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

एमपीएससी परीक्षेतून होणारा भाजपधार्जिणा प्रचार रोखा: यशोमती ठाकूर

RFO दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी निलंबित

हाथरस प्रकरणावेळी भाजपचे नेते गप्प का होते; यशोमती ठाकुरांचा पलटवार

व्हिडीओ पाहा :

Yashomati Thakur on crime against women and Vishakha Committee in offices