आदित्य ठाकरे दिल्लीत, एकनाथ शिंदे यांना धक्का देण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’?

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार वाचलं आहे. या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आता आगामी काळात काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आता ठाकरे गटाच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत.

आदित्य ठाकरे दिल्लीत, एकनाथ शिंदे यांना धक्का देण्यासाठी मास्टर प्लॅन?
Image Credit source: tv9
Reporter Sandeep Rajgolkar | Edited By: Chetan Patil | Updated on: May 13, 2023 | 8:30 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात आगामी काळात काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण सुप्रीम कोर्टाचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटात घडामोडींना वेग आला आहे. सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशाच्या खंडपीठाने दोन दिवसांपूर्वी म्हणजे 11 मे ला निकाल जाहीर केला. या निकालात महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कृतीवर कडक शब्दांत ताशेरे ओढण्यात आले आहेत. तसेच शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांची प्रतोद पदी करण्यात आलेली नियुक्ती बेकायदेशीर ठरवण्यात आली आहे. पण तरीही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्द्यावर निर्णय घेण्याची जबाबदारी देण्यात आलीय. त्यानंतर आता घडामोडींना वेग आला आहे.

सुप्रीम कोर्टाचा निकाल जाहीर झाल्यानंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज थेट दिल्लीत दाखल झाले आहेत. आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत जावून वकील देवदत्त कामत यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. देवदत्त कामत यांनी सुप्रीम कोर्टात अतिशय बेधडकपणे ठाकरे गटाची भूमिका मांडली होती. वकील कपिल सिब्बल, वकील अभिषेक मनुसिंघवी यांच्यासह देवदत्त कामत यांनीदेखील कोर्टात महत्त्वाचा युक्तिवाद केला होता.

आता सुप्रीम कोर्टाकडून निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालात ठाकरे गटाने आर्धी लढाई जिंकली आहे. अजूनही पूर्ण लढाई लढायची राहिली आहे. त्याच कायदेशीर लढाईसाठी स्वत: आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. याआधी ठाकरे गटाचे नेते अनिल परब, अनिल देसाई हे दिल्लीत वकिलांच्या भेटीगाठी घेण्यासाठी येत होते. त्यानंतर आता आदित्य ठाकरे दिल्लीत आले आहेत.

वकिलांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया काय?

आदित्य ठाकरे यांनी वकील देवदत्त कामत यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी वकिलांसोबतच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याविषयी सविस्तर माहिती दिली नाही. पण त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं. “निकाल लागलेला आहे. आता पुढची पावलं आहेत, विधानसभा अध्यक्षांकडे निकाल अपेक्षित आहेत. त्यासाठी पुढे कारवाई होईलच”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.

आदित्य ठाकरे यांची कर्नाटक निवडणुकीवर प्रतिक्रिया

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. “आजचं बहुमत काँग्रेसला मिळालं आहे. आज वेगळ्या राजकारणाला सुरुवात होत आहे. बदलाचे वारे आता वाहू लागले आहेत आणि ते आता दिसतंय. जे 40 टक्क्याचं सरकार गेलेलं आहे. पण त्याहून अधिक भ्रष्ट सरकार महाराष्ट्रात बसलेलं आहे ते देखील आम्ही घालवू, याची आम्हाला खात्री आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे यांनी आपण त्यांच्यावर कधीच बोलत नाही. आपण कुणावरही वैयक्तिक टीका करत नाही, असं म्हटलं.

“कर्नाटकात अनैतिक भ्रष्ट सरकार जे लोकांनी घालवलं आहे, तसंच महाराष्ट्रातीलही घटनाबाह्य, अनैतिक आणि असंविधानिक सरकार बसलेलं आहे. हे सरकार फक्त बिल्डर्स आणि कॉन्ट्रॅक्टर्स यांचीच मदत करणारं सरकार आहे. ते देखील महाराष्ट्रातील जनता पळवून लावू शकते”, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

Follow Us