Nagpur Rain Update : नागपूर का तुंबलं?, 400 नागरिकांना सुरक्षित का हलवावं लागलं?

| Updated on: Sep 23, 2023 | 7:38 PM

शनिवारी पहाटे लोकं उठले तेव्हा पाऊस थांबला होता. पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. जाग असणारे कुणी सांगतात ढगफुटी झाली. तर कुणी सांगतात विजेच्या कडकडाटानंतर पावसाने जोरदार बॅटिंग केली.

Nagpur Rain Update : नागपूर का तुंबलं?, 400 नागरिकांना सुरक्षित का हलवावं लागलं?
Follow us on

नागपूर : नागपूर हे उपराजधानीचं शहर. विदर्भातील पहिल्या क्रमांकाचे शहर. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या श मोठ्या प्रमाणात विकास केला. स्मार्ट सिटी अशी ओळख या शहराला मिळाली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जी ट्वेंटीच्या निमित्तानं शहरात रंगरंगोटी करण्यात आली. कोट्यवहराचाधी रुपये खर्च करण्यात आले. नाग नदी (शहरातील सर्वात मोठी गंधी नाली) जी- २० च्या निमित्ताने झाकोळण्यात आली. दुर्गंधी दिसू नये, यासाठी प्रशासनाच्या वतीनं कसोसीने प्रयत्न करण्यात आले. पण, आज पहाटे धुवाधार पाऊस बरसला. पहाटे दोन ते पाच या तीन तासांत विजांच्या कडकडासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. शहरातील सखल ठिकाणी पाणी साचले. नागपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे सीताबर्डीत तीन ते चार फूट पाणी साचले होते. सीताबर्डी येथील बसेस पाण्याखाली आल्या. पुराच्या पाण्याने आजूबाजूची जागा उखडली. निकृष्ट बांधकामाचे पितळ उघडे पडले. मनपा आणि जिल्हा प्रशासन कामाला लागले. एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर आणि नागपूर मनपाचे कर्मचारी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या कामाला लागले. पुरात अडकलेल्या सुमारे ४०० नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी हलवले. पण, यात तीन महिलांचा बळी गेला. १४ जनावरे दगावली.

नागपुरात पहाटे काय घडलं?

शनिवारी पहाटे दोन वाजता अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. पहाटे दोन ते सहा वाजताच्या दरम्यान १०९ मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली. अंबाझरी तलावातील पाण्याचा ओव्हरफ्लो झाला. अंबाझरी रस्त्याखालील रस्ते पुराने उखडले. अंबाझरी आणि वर्मा ले-आऊट तसेच शंकरनगर भागात मोठ्या प्रमाणात पाणी वस्त्यांमध्ये शिरले. घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिक घराच्या छतावर गेले. कुणाच्या घरचे भांडे वाहून गेले तर कुणाच्या घरचे सिलेंडर वाहून गेले.

जिल्हा प्रशासनातर्फे सुटी जाहीर

नागपुरात आज पहाटेचा विक्रमी पाऊस पाहता जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर केली. सखल भागात पाणी साचल्याने ४०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवल्याचे प्रशासनाने जाहीर केले. महेशनगर परिसरातील मिराबाई पिल्ले (वय ७०) आणि तेलंगखेडी परिसरातील सुरेंद्रगड येथील संध्या डोरले (वय ८०) यांचा मृत्यू झाला. हजारीपहाड भागातील गोठ्यात बांधलेली चौदा जनावरे दगावली. सहा म्हशी, सहा गायी आणि दोन वासरे गेली. योगेश वऱ्हाडपांडे, राजेश वऱ्हाडपांडे यांचे मोठे नुकसान झाले. नंदनवन परिसरातील स्वातंत्र्य गल्ली क्रमांक चार आणि सहा झोपडपट्टी भागात घरांची पडझड झाली.

का तुंबलं पुराचं पाणी?

नागपूर शहराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. गल्लोगल्लीत सिमेंटचे रस्ते झाले. शहराच्या चारही बाजूला जाण्यासाठी सिमेंटचे रस्ते आहेत. तरीही शहरात वाहनांची गर्दी होते. त्यामुळे मेट्रो आणण्यात आली. नाग नदी अरुंद पडू लागली. शहरातील इतर नद्यांचे पात्र सिमेंटने मर्यादित करण्यात आले. एकीकडे रस्ते, दुसरीकडे सिमेंटची घरे. पाणी मुरण्यासाठी जागा राहिली नाही. पाणी वाहून जाण्याचे क्षेत्र छोटे झाले. त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले. नरेंद्रनगर, सीताबर्डी, अंबाझरी या परिसरात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी तुंबले.

अशी थांबली चाके

नागपुरातील बहुतेक वाहतूक ही आपली बसने होते. शिवाय मेट्रो आणि खासगी वाहनांनी ये-जा करावी लागते. पण, आज पहाटे सीताबर्डी येथील शहर बसस्थानकचं पाण्याखाली आले. अर्ध्या बसेसमध्ये तीन-चार फूट पाणी शिरले. त्यामुळे आपली बस वाहतूक बंद होती. पूर्व आणि पश्चिम नागपूरला जोडणाऱ्या नरेंद्रनगर पुलाखाली सात ते आठ फूट पाणी साचले होते. अंबाझरी तलावाच्या खालील वस्त्यांमध्ये तर पाणीच पाणी होते. या सर्व परिस्थितीमुळे आज नागपूरकर थांबले होते.