Nagpur Rain : नागपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हाहाकार, नवेगाव खैरी धरणाचे 16 दरवाजे उघडले, नदी शेजारच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पण पुरामुळे अद्याप कुणाला दुसरीकडे शिफ्ट करण्याची गरज पडली नाही. यंत्रणा सज्ज आहेत, अशी माहिती नागपूरच्या जिल्हाधिकारी आर विमला यांनी पत्रकार परिषदेत दिलीय.

Nagpur Rain : नागपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हाहाकार, नवेगाव खैरी धरणाचे 16 दरवाजे उघडले, नदी शेजारच्या गावांना सतर्कतेचा इशारा
नागपुरातील नवेगाव खैरी धरणाचे 16 दरवाजे उघडले
Image Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: Jul 13, 2022 | 3:12 PM

नागपूर : नागपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. पावसामुळे मोठं नुकसान झालंय. पुरात वाहून गेल्याने 2 दिवसांत 8 जणांचा मृत्यू झालाय. पुरामुळे 88 जनावरांचा मृत्यू झालाय. 300 पेक्षा जास्त घरांचं नुकसान झालंय. जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांत 12 जणांचा वीज पडून मृत्यू झालेत. अडीच हजारांपेक्षा जास्त हेक्टर शेतीचं नुकसान झालंय. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन नागपूरच्या जिल्हाधिकारी आर विमला ( R. Vimala) यांनी केलंय. नागपूर जिल्ह्यातील नवेगाव खैरी धरणाचे 16 दरवाजे उघडण्यात आलेत. नांद धरणातून (Nand Dam) पाण्याचा विसर्ग सुरु आहे. याशिवाय गोसीखुर्दमधील (Gosikhurd) बॅक वॅाटरमुळे पूरस्थिती निर्माण झालीय. त्यामुळे नदीशेजारच्या गावांना सतर्कतेचा इशारा झालाय.

पाहा व्हिडीओ

धरणापुढील गावांना सतर्कतेचा इशारा

पण पुरामुळे अद्याप कुणाला दुसरीकडे शिफ्ट करण्याची गरज पडली नाही. यंत्रणा सज्ज आहेत, अशी माहिती नागपूरच्या जिल्हाधिकारी आर विमला यांनी पत्रकार परिषदेत दिलीय. उद्या आणि परवा ॲारेंज अलर्ट घेण्यात आलाय. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील वडगाव धरणाची 17 दारे उघडण्यात आली आहे. धरणा पुढील व नदी क्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यातील 5 मोठ्या प्रकल्पापैकी एक असणाऱ्या नवेगाव खैरी या धरणाचे पूर्ण 16 दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणा पुढील क्षेत्रात असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

शाळांना सुटी मिळणार का?

काही गावात पुरात पाणी येण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत शाळांना सुटी देता येईल का, यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांशी चर्चा करण्यात येईल. परिस्थिती पाहून शासनाच्या निर्देशानुसार निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. ज्या घरचे पुरात वाहून गेले त्यांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांपर्यंत मदत शासनाकडून दिली जाते. याशिवाय गरजूंना सेवा सुविधा पुरविण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं जिल्हाधिकारी विमला यांनी सांगितलं. साप चावल्यास काय उपाययोजना करायच्या, वीज पडल्यास काय काळजी घ्यायला हवी. यासंदर्भात आधीच माहिती दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय आरोग्य विभागाकडं पुरेशा प्रमाणात औषधसाठी असल्याचंही त्या म्हणाल्या.