बारसं आणि दहाव्याला जाताना भीषण अपघात, काका-पुतणी जागीच ठार; 12 महिला जखमी

| Updated on: Jun 05, 2023 | 1:38 PM

नागपूर आणि बीडमध्ये अत्यंत भीषण अपघात झाला आहे. नागपूरमध्ये बारशाला जाताना झालेल्या अपघातात काका-पुतणी दगावली आहे. तर बीडमध्ये झालेल्या अपघातात 12 महिला जखमी झाल्या आहेत.

बारसं आणि दहाव्याला जाताना भीषण अपघात, काका-पुतणी जागीच ठार; 12 महिला जखमी
road accident
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील मौदा-रामटेक महामार्गावर अत्यंत भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोनजण ठार झाले आहेत. बारशाच्या कार्यक्रमाला जात असताना काका आणि पुतणीचा अपघात झाला. या अपघातात दोघेही जागीच ठार झाले. काकू मात्र वाचली आहे. त्यामुळे या कुटुंबावर दु;खाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

टिप्परच्या धडकेत काका-पुतनी जागीच ठार

नागपूर जिल्ह्याच्या मौदा-रामटेक मार्गावर हा भीषण अपघात झाला. काका, काकू आणि पुतणी असे तिघेजण दुचाकीवरून बारशाच्या कार्यक्रमाला जात होते. मात्र, मध्येच टिप्परने कट मारली. त्यामुळे काकांचा तोल गेला आणि या तिघेही रोडवर आदळले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला प्रचंड मार लागला. या अपघातात काका आणि पुतणीचा जागीच मृत्यू झाला. तर काकू या बचावल्या असून त्यांनाही गंभीर मार लागला आहे. काकांचं नाव शिवदास वंजारी असून पुतणीचं नाव श्रुती वंजारी असं आहे. काकू रेखा वंजारी गंभीर जखमी झाल्या असून त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

12 महिला आणि 4 पुरुष जखमी

बीडमध्येही असाच भीषण अपघात झाला. दहाव्याच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या वाहनाचा बीडच्या पाली जवळ अपघात झाला. या अपघातात 12 महिलांसह 4 पुरुष जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन वाहने समोरासमोर आली. यात समोरून आलेल्या वाहनाने पिकपला हुलकावणी दिली. या घटनेत पिकअप रस्त्याच्या कडेला भिंतीवर धडकला. त्यामुळे 16 जण जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे. चौसाळा परिसरातील तेलंगशी गावातील लक्ष्मीबाई जायभाय यांचे निधन झाले होते. त्यांच्या दहाव्यासाठी निघालेल्या या पिकपचा अपघात झाला आहे.

चंद्रपुरातील मृतांची संख्या 6 वर

नागपूरहून नागभीडकडे जाणाऱ्या एका खासगी बसला काल चंद्रपूर येथे भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर उपचार सुरू असलेल्या दोन जणांचा आज मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या सहावर गेली आहे. हा अपघात अत्यंत भीषण होता. खासगी बस आणि कारचा समोरा समोर अपघात झाला. बसची एवढी जोरदार धडक होती की त्यामुळे कारचा पुढचा भाग चक्काचूर झाला. यावेळी कारमधील सर्वच्या सर्वच दगावले.

रविवारी दुपारी 4 वाजता हा भीषण अपघात झाला. नागभीडपासून 17 किलोमीटर अंतरावरील कनपा गावात ही दुर्घटना घडली. रोहन विजय राऊत (30), ऋषिकेश विजय राऊत (28), प्रभा शेखर सोनवणे (35), गीता विजय राऊत (50), सुनीता रूपेश फेंडर (40) आणि यामिनी (9) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत.