भय इथले संपत नाही…कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नाशिकमध्ये नवे नियम, जाणून घ्या माहिती!

| Updated on: Dec 25, 2021 | 12:57 PM

कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन विषाणूमुळे जगभरात धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातही सार्वजनिक ठिकाणच्या वावरासाठी आता नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. लस नसेल, तर कुठेही प्रवेश मिळणार नाही.

भय इथले संपत नाही...कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नाशिकमध्ये नवे नियम, जाणून घ्या माहिती!
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नाशिकः राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. तेच नियम काल मध्यरात्रीपासून नाशिकमध्येही लागू करण्यात आले आहेत. युरोप तसेच युकेमध्ये ओमिक्रॉनची रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे. जगातील 110 देशांमध्ये ओमिक्रॉनचा प्रसार झाला आहे. या विषाणूच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत व पुढील काळात याचा प्रसार बघून अधिक निर्बंध लावण्याबाबत विचार करण्यात येणार आहे.

लस नसेल तर प्रवेश नाही

कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन विषाणूमुळे जगभरात धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातही सार्वजनिक ठिकाणच्या वावरासाठी आता नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. लस नसेल, तर कुठेही प्रवेश मिळणार नाही. विनालसीकरण लोक आढळले, तर संबंधित आस्थापनांना जबाबदार धरले जाईल, या नियमांची गुरुवार 23 डिसेंबरपासून अंमलबजावणी करण्यात येत आहे.

नाशिकमध्येही नवे नियम

ख्रिसमस उत्सव, लग्न समारंभ, नवीन वर्षाचे स्वागत यामुळे गर्दी वाढून संसर्गाचा धोका वाढण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 प्रमाणे संपूर्ण राज्यात काही अतिरिक्त निर्बंध लावण्यात आले आहेत. नाशिकमध्येही हे नियम लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 24 डिसेंबर रोजी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्या स्वाक्षरीने हे अतिरिक्त निर्बंध काय असतील, याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

लग्न समारंभः 100 जणांची उपस्थिती

संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत बंदी असेल. लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते. इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखीलउपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते. या दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशा ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसेल. तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी 25 टक्के उपस्थिती असेल.

क्रीडा स्पर्धाः 25 टक्के उपस्थिती

क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल. वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना 27 नोव्हेंबर 2021 चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.

चित्रपटगृहेः 50 टक्के उपस्थिती

उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच 50 टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल. याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी त्यांनी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.

इतर बातम्याः

मालेगावमध्ये पोतं भरून तलवारी सापडल्या…अन् पोलिसही गेले चक्रावून, नेमका काय डाव होता?

Nashik | नाशिककरांनो सावधान, शहरात पुन्हा कडक हेल्मेटसक्ती, 1 हजाराच्या दंडासोबत….