उरणमध्ये कुटुंबाला घेरून हल्ला; रॉडने मारहाण, कुऱ्हाड फेकल्याचा आरोप
नवी मुंबईतील उरणमधील द्रोणागिरीत एका कुटुंबावर 10-15 जणांनी जीवघेणा हल्ला केला. लॉजिस्टिक्स व्यावसायिक रुपेश भोईर गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

रिपोर्टर – रवी खरात : महाराष्ट्रातील गुन्ह्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या असून सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच आता नवी मुंबई पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या उरणमधील द्रोणागिरी परिसरात एका कुटुंबावर हल्ा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 10 ते 15 जणांनी एक कुटुंबावर हल्ला केल्याची बयानक घटना नुकतीच उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, द्रोणागिरी सेक्टर-50 येथील मधील निर्मल हाइट्सजवळ हा प्रकार घडला. या हल्ल्यात लॉजिस्टिक्स व्यावसायिक रूपेश विनोद भोईर जखमी झाले असून, त्यांची पत्नी आणि मुलीवरही हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
स्कूटरचीही तोडफोड केल्याचा आरोप
पोलिसांच्या सांगण्यानुसार, हल्लेखोरांनी रूपेश भोईर यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. एवढंच नव्हे तर त्यांची पत्नी आणि मुलीच्या दिशेनेदेखील जीवघेण्या पद्धतीने कुऱ्हाड फेकण्यात आली. हल्लेखोर काही तेवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी भोईर यांच्या स्कूटरचीही तोडफोड केली. या हल्ल्यात रूपेश भोईर गंभीररित्या जखमी झाले आहेत.
या धुमश्चक्रीदरम्यान भोईर यांच्या पत्नीच्या गळ्यातील अंदाजे 1 ते 1.5 तोळे वजनाची सोन्याची साखळी, रोख रक्कम आणि मोबाईल फोन गहाळ झाल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या जीवघेण्या हल्ल्यानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी काही हल्लेखोरांची नावे पोलिसांना सांगितली. त्यामध्ये गुड्डू सिंग, बंटी सिंग आणि संदीप सिंग यांचा समावेश आहे.
या भयानक घटनेनंतर उरण पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुड्डू सिंह, बंटी सिंह, संदीप सिंह यांच्यासह 10 ते 15 अज्ञात व्यक्तींविरोधात हत्येचा प्रयत्न, दंगल आणि तोडफोडीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाला सुरुवात केली असून, हल्ल्यात सहभागी असलेल्या संशयितांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश विठ्ठल कोंडालकर करत आहेत.
दरम्यान, भोईर यांच्यावर झालेला हल्ला तसेच चिमुकल्या मुलीच्या दिशेने कुऱ्हाड फेकल्याच्या गंभीर आरोपामुळे द्रोणागिरी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे.