Ajinkya Rahane : वैभव सूर्यवंशीला बाहेर का काढलं पाहीजे? अजिंक्य रहाणे याने सांगितलं कारण..
भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना13 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. या मालिकेत वैभव सूर्यवंशीला 'प्लेइंग इलेव्हन'मध्ये संधी मिळणार का नाही याची चर्चा आहे, यावर आता अजिंक्य रहाणेनेही त्याचे मत व्यक्त केले आहे. त्याने काय म्हटलंय?

वैभव सूर्यवंशीच्या क्रिकेटचे लाखो चाहते तयार झाले आहेत. आता त्याचा खेळ अधिक खुलतो आहे. त्याला खेळताना पाहण्यासाठी मैदानात प्रेक्षक गर्दी करतात. पण टीम इंडियाचा दिग्गज आणि माजी कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणे याने वेगळंच मत व्यक्त केलं आहे. त्याने असं म्हटलंय की वैभवला अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी टी20 मालिकेमध्ये ब्रेक द्यावा आणि त्याच्या जागेवर संजू सॅमसन याला संधी देण्यात यावी. अभिषेक शर्मासोबत ओपनिंगला संजूला पाठवावं असं अजिंक्यने म्हटलं आहे. दरम्यान, वैभवने इंग्लंड दौऱ्यामध्ये त्याचे पदार्पण केले आहे. त्याशिवाय त्याने झिम्ब्बाम्बेविरुद्धच्या मालिकेतही प्रचंड चांगली कामगिरी केली होती. 6 सामन्यांमध्ये त्याने 32.16 च्या सरासरीने 193 धावा बनवल्या. एवढच नाही तर त्याने दोन अर्धशतकंही ठोकले. तरीही रहाणे म्हणाला की वैभवला अफगाणिस्तानविरुद्ध ड्रॉप करण्याचं मत व्यक्त केलं आहे.
सूर्यवंशीला वगळण्यावर काय म्हणाला रहाणे?
अजिंक्य रहाणेने आपल्या युट्यूब चॅनेलवर सांगितलं की, “टी-20 विश्वचषकात खेळलेले अव्वल तीन फलंदाजच अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतही खेळायला हवेत. तो म्हणाला, “मला वाटतं की विश्वचषकात खेळलेले टॉप तीन फलंदाज संघात असायला हवेत. संजू सॅमसनने खूप चांगली कामगिरी केली होती, पण त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आलेकदाचित दोन-तीन खराब डावांमुळे असे झाले असावे. तरीही, संजू सॅमसनला आणखी एक संधी मिळावी अशी माझी इच्छा आहे. तसेच, अभिषेक शर्मा आणि इशान किशन, ज्यांनी आपल्यासाठी चांगली कामगिरी केली आहे, त्यांनाही संधी मिळायला हवी. सूर्यवंशीलाही त्याची संधी मिळेलच, त्याची वेळ नक्कीच येईल. पण सध्या तरी, संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन हेच ते अव्वल तीन फलंदाज असावेत असे मला वाटते.”
त्यामुळे आता टीम इंडियाचे निवडकर्ते वैभवला खेळवणार की नाही याकडे लक्ष लागलेलं आहे. पण आधीपासूनच असा अंदाज लावला जात आहे की, पहिल्या दोन सामन्यांमध्ये वैभव बाहेर असेल पण तिसऱ्या सामन्यात वैभवला संधी मिळू शकते. सूर्यवंशी या सीरिजमध्ये बॅकअप ओपनर म्हणून राखीव खेळाडू सारखे काम करण्याची शक्यता आहे.
