नरेंद्र मोदी यांनी जे काल सांगितले ते सत्य नाही, खडसे यांच्याकडून मोदींची पोलखोल; नाथाभाऊंचं पूर्ण सत्य काय?

लोकसभेच्या निवडणूका येऊ घातल्या आहेत. त्या निवडणूका जिंकायचा असेल तर शिवसेना आव्हान देऊ शकते म्हणून शिवसेनेला (ठाकरे ) टार्गेट केलं जातंय.

नरेंद्र मोदी यांनी जे काल सांगितले ते सत्य नाही, खडसे यांच्याकडून मोदींची पोलखोल; नाथाभाऊंचं पूर्ण सत्य काय?
eknath khadse
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 09, 2023 | 2:54 PM

नाशिक | 9 ऑगस्ट 2023 : उद्धव ठाकरे यांनीच आमच्याशी असलेली युती तोडली, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल महाराष्ट्रातील खासदारांच्या बैठकीत केला. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. 2014मध्ये काय झालं? युती कोणी तोडली? युती तोडण्याचा फोन उद्धव ठाकरे यांना कुणी केला होता? याची माहिती मोदींनी घ्यावी. सर्व माहिती रेकॉर्डवर आहे, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला होता. आता त्यावर तत्कालीन भाजपचे नेते आणि आताचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मौन सोडलं आहे. नरेंद्र मोदी यांनी काल जे सांगितलं ते सत्य नाही, असं सांगत नाथाभाऊंनी नरेंद्र मोदीयांची पोलखोल केली आहे.

स्वतंत्र लढण्याचा निर्णय झाला

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे मीडियाशी संवाद साधत होते. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीच्या खासदारांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी 2014मध्ये शिवसेनेने युती तोडल्याचा दावा केला आहे. युती आम्ही तोडली नाही. उद्धव ठाकरे यांनीच तोडली, असं मोदी म्हणाले. मोदींनी खासदारांना जे सांगितलं ते अर्धसत्य आहे. मी त्यावेळी विरोधी पक्षनेता होतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात वातावरण तयार झालं होतं. त्यामुळे भाजपचं सरकार येईल असा आम्हाला विश्वास होता. भाजपकडे येणाऱ्यांचा ओघ वाढला होता. त्यामुळे अनेकांना तिकीट देणं कठिण होतं. म्हणून आमच्यात चर्चा सुरू झाली. त्यात स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.

दोन महिन्याआधीच तो निर्णय

निवडणुकीच्या दोन अडीच महिन्याआधीच युती तोडण्याचा आमचा निर्णय झाला होता. त्यानंतर भाजपने युती तोडली. आम्ही पक्षात चर्चा करूनच निर्णय घेतला. त्यावेळी सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस आणि मीही होतो. युती तोडायचं हे कुणी आणि कसं सांगावं? यावर आमच्यात चर्चा झाली. मला तातडीने मुंबईला बोलावलं गेलं. फडणवीस त्यावेळी प्रदेशाध्यक्ष होते. फडणवीस यांनीच युती तोडण्याची घोषणा करायला हवी होती. पण ती जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. त्यानंतर मी उद्धव ठाकरे यांना फोन करून युती तोडत असल्याचं सांगितलं, असं खडसे म्हणाले.

निर्णय माझा नाही तर…

जागा वाटपावरून युती होत नसल्याचं उद्धव ठाकरे यांना सांगितलं आणि युती तोडली. त्यानंतर सुभाष देसाई आणि अरविंद सावत आले. युती तोडू नका असा आग्रह त्यांनी धरला. त्यावर हा निर्णय माझा नाही. तर तो पक्षाचा आहे, असं मी त्यांना सांगितलं. त्यावेळी हेच घडलं होतं. नरेंद्र मोदी यांनी काल जे सांगितलं ते सत्य नाही. त्यावेळी केंद्राचे निरीक्षकही आले होते. महाराष्ट्राचे प्रभारीही होते. त्यांनी मला युती तोडल्याची घोषणा करायला सांगितलं, असं नाथाभाऊ यांनी स्पष्ट केलं.

मलाच बदनाम केलं

युती तोडण्यामागे जागा वाटप हा मुद्दा होताच. शिवसेना तेव्हा 171 जागांवर लढत होती. देशात भाजपचं वातावरण होतं. त्यामुळे अधिकच्या जागा मिळाव्यात अशी भाजपची इच्छा होती. म्हणून युती तोडली. आपली सत्ता येईल असा विश्वास वाटत होता. त्यामुळे युती तोडली. मला काय वाटत होतं याच्यापेक्षा पक्षाला काय वाटत होतं हे महत्वाचे आहे. पण तेव्हा मलाच बदनाम केलं गेलं, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

शिंदे वरचढ होतील म्हणून…

लोकसभेच्या निवडणूका येऊ घातल्या आहेत. त्या निवडणूका जिंकायचा असेल तर शिवसेना आव्हान देऊ शकते म्हणून शिवसेनेला (ठाकरे ) टार्गेट केलं जातंय. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्ष फोडला तेव्हा एकनाथ शिंदे अधिक बीजेपी असे बहुमत झाले होते. तिसऱ्या पक्षाला सोबत घेण्याची गरज नव्हती. पण सर्व्हे आले. त्यात शिंदे गट आणि भाजप युती करूनही सत्तेत येऊ शकत नसल्याचं स्पष्ट झालं. त्यातच एकनाथ शिंदे अधिक प्रभावी होऊ नये म्हणून राष्ट्रवादीचा एक गट सोबत घेतला. सीनिअर आणि ज्युनिअर उपमुख्यमंत्री झाले, असं ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us