नितीन गडकरींचं पंतप्रधान-राष्ट्रपती पदाबाबत मोठे विधान; म्हणाले जनतेचं प्रेम…

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथील कार्यक्रमात राष्ट्रपती आणि पंतप्रधान पदापेक्षा जनतेचे प्रेम श्रेष्ठ असल्याचे म्हटले आहे. तसेच जॉर्ज फर्नांडिस यांच्या आठवणींना उजाळा देत 'झेड प्लस' सुरक्षेवरही त्यांनी मिश्कील टिप्पणी केली.

नितीन गडकरींचं पंतप्रधान-राष्ट्रपती पदाबाबत मोठे विधान; म्हणाले जनतेचं प्रेम...
nitin gadkari
| Updated on: May 25, 2026 | 11:32 AM

“लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद हीच जीवनाची खरी संपत्ती आहे. राष्ट्रपती किंवा पंतप्रधान पदाची काय गरज आहे? जनतेचं प्रेम हेच सर्वात मोठं पद आहे,” असे भावनिक आणि थेट विधान केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. नागपुरातील राष्ट्रभाषा परिवारातर्फे आयोजित “मित्रों के बीच” या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या राजकीय प्रवासातील अनेक अनुभव आणि आठवणींना उजाळा दिला.

नागपुरातील राष्ट्रभाषा परिवारातर्फे मित्रों के बीच या कार्यक्रमावेळी नितीन गडकरी यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात गडकरींनी देशभरातील जनतेकडून मिळणाऱ्या प्रेमाचे उदाहरण दिले. “वय वाढत असतं आणि राजकारण त्याच्या हिशोबाने चालत असतं, मला त्याची कधीच चिंता नसते. लोकांची सेवा करणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे. जेव्हा मी काश्मीरला जातो, तेव्हा तिथला ढाबेवाला नागपूरवरून आलोय असं ऐकल्यावर माझ्याकडून बिल घेत नाही. इतकंच काय, तर मेघालय, त्रिपुरा यांसारख्या दुर्गम राज्यांमध्येही नागपूरचे नाव ऐकून लोक पैसे घेत नाहीत, असे लोक स्वतः मला येऊन सांगतात. हे जे लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद मिळतात, तीच माझी खरी कमाई आहे आणि यातूनच मला काम करण्याची प्रेरणा मिळते, असे नितीन गडकरी म्हणाले.

जॉर्ज फर्नांडिस यांच्या आठवणी आणि ‘झेड प्लस’ सुरक्षा

यावेळी माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या आठवणींना उजाळा देत नितीन गडकरींनी सध्याच्या व्हीआयपी संस्कृतीवर मिश्कील टिप्पणी केली. आम्ही जॉर्ज फर्नांडिस यांना खूप मानायचो. मी गेल्या ४५ वर्षांपासून त्यांच्या एका गोष्टीचे अनुकरण करत आहे. त्यांना विमानतळावर स्वागत केलेले, कोणी पुष्पगुच्छ दिलेले किंवा हार घातलेले अजिबात आवडायचे नाही. ते इतके मोठे नेते असूनही अत्यंत साधे राहायचे. एकदा ते मुंबईत माझ्या घरी आले होते, तेव्हा आम्ही दोघेही कोणत्याही सुरक्षेशिवाय गिरगाव चौपाटीवर जाऊन ज्यूस प्यायलो होतो,” अशी आठवण गडकरींनी सांगितली.

पूर्वी काहीच सुरक्षा नसायची, पण आता माझ्यासोबत ५० पोलीस असतात. ही माझी मजबुरी आहे, मी त्यांना हटवू शकत नाही. माझ्या जीवाला धोका असल्याचे सांगून मला ‘झेड प्लस’ (Z+) सुरक्षा देण्यात आली आहे. मी गेल्या ४५ वर्षांपासून एक पथ्य पाळतो की, माझ्या स्वागतासाठी विमानतळावर कोणीही येऊ नये. मी गमतीने म्हणायचो की माझ्या स्वागताला विमानतळावर कुत्राही येत नाही. पण आता सुरक्षा व्यवस्थेमुळे तो (सुरक्षा पथकातील) कुत्रा आधी राऊंड मारतो आणि मगच मी येतो. मला हार आणि पुष्पगुच्छ यांचा प्रचंड तिरस्कार आहे, असेही गडकरींनी स्पष्ट केले.

Follow Us