
कराड तालुक्यातील उंडाळे येथील ओढ्याकाठी असणारी शेकडो एकर शेती पुराने पिकांसह वाहुन गेली आहे तर गाळाने विहिरी बुजल्या असून शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

जोरदार पाण्याच्या प्रवाहाने थेट ओढ्याचे पात्र शेतात आले आहे. पुराने कोट्यावधीचे नुकसान झाल्याने भरीव नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यात हाहाकार झाला आहे. माजलगाव तालुक्यातील मंजरथ, आळसेवाडी येथील शेतकरी श्यामराव किसनराव आळसे यांच्या पाच एकर सोयाबीन या पिकांमध्ये पूर्णपणे पाणीच पाणी झालंय.

मागील तीन ते चार दिवसांपूर्वी तालुक्यात पावसाने चांगलाच जोर धरला होता. या पावसाच्या साठलेल्या पाण्यामुळे पाच एकर मधील सोयाबीन पिकाचं अतोनात नुकसान झालंय. मात्र प्रशासनाकडून अद्याप पंचनामे झालेले नाहीत. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करतायेत.

गेले तीन दिवस तुडुंब भरुन वाहणारे नीरा नदी पात्रातील पाणी सध्या ओसरल्याचे चित्र इंदापूर तालुक्यात आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

वीर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून शनिवारी 22 हजार क्युसेक्स ने पाणी नीरा नदीत सोडण्यात आले होते, त्यामुळे जलसंपदा विभागाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता, वीर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आल्याने इंदापूर तालुक्यातील नीरा नदीचे पाणी ओसरल्याचे चित्र सध्या आहे.