राज ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादीमुळे जातीयवाद सुरू; शरद पवार म्हणतात, राज ठाकरे यांच्या विधानाची दखल…
शिवसैनिक आणि कडवा कार्यकर्ता उद्धव ठाकरेंसोबत आहे. काही आमदार, खासदार गेले असतील पण तळागाळात काम करणारा शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत आहे. उद्या निवडणूक आल्यावर या लोकांची भावना काय हे दिसेलच.
कोल्हापूर: राष्ट्रवादीच्या जन्मापासून राज्यात जातीयवाद निर्माण झाला आहे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनीही राष्ट्रवादी जातीयवादी असल्याची टीका केली आहे. महाजन यांनी तर राष्ट्रवादीच्या जन्मानंतर नवरा-बायकोतही भांडणं सुरू झाल्याची मिश्किल टीका केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या आरोपावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांच्या विधानाची दखल घेण्याची गरज नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवार हे कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. राज ठाकरे काही आरोप करू शकतात. राष्ट्रवादीचा जन्म झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष कोण होते त्याची यादी पाहा. भुजबळ होते. पिचड होते. अनेक लोकं होते. ते कोणत्या समाजाचे होते सर्वांना माहीत आहे. ती नावे सांगायची गरज नाही, असा चिमटा शरद पवार यांनी राज ठाकरे यांना काढला.
जातीचा विषय आमच्या मनात येत नाही. आम्ही सर्व शाहू फुले आंबेडकरी विचाराचे लोक आहोत. त्यामुळे कोणी काही टीका केली तर आम्ही त्याची दखल घेत नाही, असं शरद पवार म्हणाले.
शिवसेनेला गळती लागली आहे. त्यामुळे ठाकरे गट कमकुवत झाल्याचं सांगितलं जातं. त्यावरही शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात जातो. कोल्हापूरही येत असतो. शिवसेनेत दोन गट पडले हे खरं आहे.
पण शिवसैनिक आणि कडवा कार्यकर्ता उद्धव ठाकरेंसोबत आहे. काही आमदार, खासदार गेले असतील पण तळागाळात काम करणारा शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत आहे. उद्या निवडणूक आल्यावर या लोकांची भावना काय हे दिसेलच, असंही ते म्हणाले.
शिंदे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, असं विधान खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावरही त्यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. मला त्याबद्दल माहीत नाही. मी संजय राऊतांकडून जाणून घेईल. त्यांचं काही नियोजन असेल तर बघेल. पण ते काय म्हणाले त्याबाबत मला माहीत नाही, असं शरद पवार यांनी म्हणताच एकच खसखस पिकली.
धर्मवीर की स्वराज्यरक्षक या वादावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणणं यात काही चूक नाही. त्यात वाद करण्याची काही गरज नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.