पश्चिम महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांचा झंझावात, विरोधकांवर हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात अनेक सभा घेतल्या आहेत. महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींच्या या सभा होत आहेत. मोदींच्या या सभांवर विरोधकांनी मात्र टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सभांच्या माध्यमातून विरोधकांना उत्तर देत आहेत.
Loksabha election : पश्चिम महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांचा धडाका सुरु आहे. नरेंद्र मोदींनी आज 3 मतदारसंघात सभा घेतल्या. तर उद्याही महायुतीच्या उमेदवारांसाठी नरेंद्र मोदी सभा घेणार आहेत. दरम्यान मोदींच्या सभांवर विरोधकांनी मात्र निशाणा साधलाय. पश्चिम महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांचा झंझावात सुरुये. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी पश्चिम महाराष्ट्रातील 3 मतदारसंघात सभा घेतल्या तर मंगळवारी पुन्हा 3 मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेणार आहेत.
नरेंद्र मोदींनी सोमवारी सोलापुरात भाजप उमेदवार राम सातपुतेंसाठी सभा घेतली. कराडमध्ये उदनराजे भोसलेंसाठी आणि पुण्यात मुरलीधर मोहोळ, श्रीरंग बारणे, शिवाजी आढळराव पाटील, सुनेत्रा पवारांसाठी सभा घेतली.
उद्या माळशिरसमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांसाठी मोदी सभा घेणार आहेत. तर लातूरमध्ये सुधाकर शृंगारे, आणि धाराशिवमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटलांसाठी सभा घेणार आहेत.
मोदींच्या महाराष्ट्रातील सभांवरुन विरोधकांनी भाजपला लक्ष्य केलंय. महाराष्ट्रात जेवढ्या मोदींच्या सभा होतील तेवढा फायदा आम्हाला होणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोलापूर आणि कराडच्या सभेतून विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. संविधान बदलण्याच्या विरोधकांच्या आरोपांवर मोदींनी प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान दोन दिवसापूर्वी मोफत राशनवरुन प्रियकां गांधींनी लातूरमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. यावरुनही मोदींनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं आहे.
80 कोटी गरजूंना मोफत राशन देतोय तर काँग्रेसला त्रास होतोय. अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवर टीका केलीय. देशभरात लोकसभेची रणधुमाळी सुरु आहे. दरम्यान महाराष्ट्रात मोदींच्या सभांचा धडाका सुरुच आहे. मात्र, या प्रचारसभांचा महायुतीला किती फायदा होणार हे 4 जूननंतरच समोर येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सभेत बोलताना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. काही लोकांच्या महत्त्वकांक्षेमुळे अनेक मुख्यमंत्र्यांना आपला कार्यकाळ देखील पूर्ण करता न आल्याचं मोदींनी म्हटले आहे. मोदींनी शरद पवारांंवर ही टीका केली आहे. तर एका व्यक्तीमुळे राज्याचं मोठं नुकसान झाल्याची टीका उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.