धीरज परदेशींची हत्या कपाळावरील भगव्या टिळ्यामुळे, आमदाराचा आरोप; सीएमच्या फोननंतर माघार
अहिल्यानगर येथील धीरज परदेशी यांच्या हत्येने शहरात संतापाचे वातावरण आहे. कपाळावरील भगव्या टिळ्यामुळे त्यांची हत्या झाल्याचा आमदार संग्राम जगताप यांचा आरोप आहे, ज्यामुळे खळबळ उडाली आहे. या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारला व मोर्चे काढले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले, तरी मास्टरमाईंडच्या अटकेची मागणी कायम आहे.

सागर शिंदे, टीव्ही 9 मराठी : अहिल्यानगर मनपाचा कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांची हत्या करण्यात आल्याने संपूर्ण अहिल्यानगरमध्ये संतापाचं वातावरण पसरलं आहे. धीरज परदेशी यांच्या कपाळावरील टिळ्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आमदार संग्राम जगताप यांनी केला होता. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. परदेशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनाकडून काल अहिल्यानगर शहरात बंदची हाक देण्यात आली होती. हिंदुत्ववादी संघटनांनी हत्येच्या निषेधार्थ मोर्चाही काढला होता. या मोर्चात भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप सामील झाले होते. आंदोलक अधिक आक्रमक झाल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: आंदोलकांना फोन केल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतलं.
महापालिकेच्या विद्यूतनगर विभागातील कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर दिनांक 7 ऑगस्ट रोजी सहा ते आठ जणांनी जीवघेणा हल्ला केला. मुकुंदनगरमधील दर्गा दायरा परिसरात हा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात परदेशी गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 9 ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. परदेशी यांच्यावर झालेल्या या हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी बंदची हाक दिली होती. त्यानंतर कापडबाजार, गंजबाजार, मोची गल्ली, माळीवाडा, दिल्लीगेट, तसेच उपनगरातील बालिकाश्रम रोड, प्रोफेसर कॉलनी चौक, पाइपलाइन रोड आदी भागात बंद पाळण्यात आला.
मोटरसायकल रॅली
परदेशी यांच्या मृत्यूनंतर हिंदुत्ववादी संघटनांनी सोमवारी पाथर्डी शहर बंदची हाक दिली होती. या बंदला शहरातील व्यापारी आणि नागरिकांनी प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता शेवगाव रोड येथून हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली काढली. रॅलीदरम्यान व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. शेवगाव रोड, कोरडगाव चौक, नवी पेठ, क्रांती चौक, अजिंठा चौक, नाईक चौक, अहिल्यानगर रोड या प्रमुख मार्गांवरून रॅली काढत कार्यकर्त्यांनी शहरभर फिरून धीरज परदेशी यांच्या मृत्यूच्या घटनेचा निषेध व्यक्त केला होता.
आम्हाला सांगा, कारवाई करू
दरम्यान, परदेशी यांच्या हत्येप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आले असून कायदा हातात न घेण्याचे आवाहन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले होते. बंद पाळण्यासाठी कुणालाही जबरदस्ती करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं होतं. मा, पोलिसांकडून ज्या आरोपींना अटक करण्यात आली, त्यात मुख्य सूत्रधार नाही. या हत्याकांडाचा मास्टरमाइंड मोकळाच आहे, असं हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांनी म्हटलं होतं. मात्र एफआयआरमध्ये ज्यांची नावे आहेत त्यांच्या व्यतिरिक्त दोघांना अटक केली असल्याचे पोलीस अधीक्षकांचं म्हणणं होतं. आणखी कोणाबद्दल तक्रार असेल तर त्याबद्दल पोलिसांना कळवावे. आम्ही त्यावर कारवाई करू, असे पोलीस अधीक्षक यांनी म्हटले होते.
ठिय्या आंदोलन
दरम्यान, ज्या मॅक केअर हॉस्पिटलमध्ये परदेशी यांच्यावर उपचार सुरू होते, तिथे हिंदुत्त्ववादी संघटनांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर संध्याकाळी परदेशी यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी छत्रपती संभाजीनगरला हलविण्यात आला होता. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन सुरू करण्यात आलं. भाजप नेते गोपीचंद पडळकरही या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते. य़आ प्रकरणातील खऱ्या मास्टरमाइंडला शोधून काढून त्याला अटक करण्याची मागणी आंदोलकांनी लावून धरली होती. या ठिय्या आंदोलनात शेकडो हिंदुत्त्वादी कार्यकर्ते जमले होते.
टिळ्यामुळे हत्या
परदेशी यांच्या हत्येवर आमदार संग्राम जगताप यांनी अत्यंत कडक शब्दात प्रतिक्रिया दिली होती. धीरज परदेशी यांच्यावरील हल्ला हा पूर्वनियोजित आहे. या गुन्ह्यातील खरा मास्टरमाइंड शोधणं गरजेचं आहे. परदेशी हे लाईट बसवण्यासाठी त्या भागात गेले होते. परदेशींच्या कपाळावर भगवा टिळा असल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली, असा आरोप संग्राम जगताप यांनी केलाय
मुख्यमंत्र्यांना फोन
यावेळी आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा. देवाभाऊंना फोन करा, अशा घोषणा आंदोलक देत होते. हे आंदोलन सुरू असतानाच आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. यावेळी फडणवीसांनी कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलं
पाच जणांना अटक
परदेशी यांच्यावर हल्ला करणाऱ्या तिघांना अहिल्यानगर पोलिसांनी हैदराबादमधून अटक केली आहे. मुस्तकीम सय्यद, मेहराज सय्यद आणि सिराज सय्यद अशी आरोपींची नावं आहेत. आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्या 2 आरोपींनाही ताब्यात घेण्यात आलं आहे.
