
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिचीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 8 वर्षे उलटले आहेत. त्यानंतरही मुख्य सूत्रधारांचा शोध लागलेला नाही. त्याविरोधात पुण्यासह राज्यभरात विविध ठिकाणी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.

आज (20 ऑगस्ट) डॉ. दाभोलकरांच्या स्मृतीदिनानिमित्त अंनिसच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जमून दाभोलकरांना आदरांजली वाहिली. पुण्यात ज्या ठिकाणी हत्या झाली त्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावर येऊन 8 व्या स्मृतीदिना निमित्ताने आदरांजली वाहण्यात आली.

दाभोलकर यांच्यावर 20 ऑगस्ट 2013 रोजी मॉर्निंग वॉकच्या वेळी अज्ञातांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. त्यानंतर बराच काळ मारेकऱ्यांचा शोध लागला नाही.

अखेर या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. उच्च न्यायालयाने आपल्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले. यानंतर संशयित आरोपींना अटक झाली.

मात्र, 8 वर्षे उलटूनही या प्रकरणाचा खटला न्यायालयात उभा राहिलेला नाही. त्यामुळे तात्काळ हा खटला सुरू करुन आरोपींना शिक्षा करण्याची मागणी अंनिसकडून केली जात आहे.

दाभोलकरांच्या हत्येनंतर अंनिसचे कार्यकर्ते दरवर्षी राज्यभरात ठिकठिकाणी आदरांजली वाहत गुन्हेगारांना अटक करुन शिक्षा देण्याची मागणी करतात.

यंदाही ही मागणी केली जातेय. आज अनेक कार्यकर्ते हातावर काळ्या पट्टया बांधून आदरांजली वाहण्यासाठी वेगवेगळे फलक घेऊन रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले.

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे देखील अंनिसच्या कार्यकर्त्यांनी फलक घेऊन दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना शिक्षेची मागणी केली.

यावेळी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देत आपल्या मागण्या पोहचवल्या.

घाटकोपरमध्ये देखील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लहान मोठ्या कार्यकर्त्यांनी हातात बॅनर घेऊन मारेकऱ्यांना शिङेची मागणी केली.

एकूणच राज्यभरात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दाभोलकरांना आदरांजली वाहताना गुन्हेगारांना शिक्षा देण्याची जोरकस मागणी करण्यात आलीय.

अंनिसचे राज्यभरातील ठिकठिकाणचे आंदोलन-मोर्चे.