Pune News : पुणे चांदणी चौक पुलासाठी 865 कोटींचा खर्च, पण वाहतूक कोंडी ‘जैसे थे’

pune chandni chowk bridge : पुणे येथील चांदणी चौकातील पूल सुरु झाला. गेल्या सहा वर्षांपासून या पुलाची प्रतिक्षा होती. त्यानंतरही पुणे शहरातील वाहतूक समस्या पूर्णपणे सुटली नाही. यासंदर्भात आमदार सत्यजित तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

Pune News : पुणे चांदणी चौक पुलासाठी 865 कोटींचा खर्च, पण वाहतूक कोंडी जैसे थे
Chandni Chowk
| Updated on: Sep 10, 2023 | 4:01 PM

पुणे | 10 सप्टेंबर 2023 : पुणे शहरातील चांदणी चौक (Chandani chowk) पूल पाडून नवीन पूल बांधण्यात आला. या नवीन पुलाचे उद्घाटन काही दिवसांपूर्वी झाले होते. या पुलामुळे चांदणी चौकातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असा दावा केला जात होता. परंतु हा पूल सुरु होऊनही या चौकातील वाहतूक कोंडी सुटलेली नाही. यासंदर्भात आमदार सत्यजित तांबे यांनी एक व्हिडिओ ट्विट केल्यानंतर पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. यामुळे 865 कोटी रुपये खर्च करुन उभा राहिलेल्या या पुलासंदर्भात विरोधकही टीका करत आहेत.

का सुटली नाही समस्या

चांदणी चौकातील पूल तयार करताना उड्डाणपूल आणि अंडरपास तयार केला गेला आहे. यामुळे संभ्रम निर्माण होत आहे. हा संभ्रम दूर होण्यास काही दिवस लागतील, असे लोकांना वाटत होते. मात्र, पुलाच्या उद्घाटनास आता जवळपास महिना झाला आहे, त्यानंतर वाहनधारकांचा गोंधळ सुरु आहे.

काय म्हणतात स्थानिक नागरिक

फहीम मुल्ला या नागरिकाने सांगितले की, “चांदणी चौकातील पूल हा एक चांगला प्रकल्प आहे. पण यामुळे वाहनधारक संभ्रमात आहेत. एखाद्याला मुळशीला जायचे असल्यास त्याला तो रस्ता सापडत नाही. वाहनधारकाची परिस्थिती एखाद्या चक्रव्यूहत अडकल्याप्रमाणे झाली आहे. तसेच NDA कडे जातांनाही वाहनधारकांचा गोंधळ उडतो.”

आमदार सत्यजित तांबे यांनी वेधले लक्ष

आमदार सत्यजीत तांबे यांनी चांदणी चौकातील पुलासंदर्भात शनिवारी एक व्हिडिओ शेअर केला. त्यांना पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा मुद्दा उपस्थित केला. पुण्यातील या वाहतूक कोंडीमुळे अनेक आयटी कंपन्या शहरबाहेर गेल्या आहेत. तसेच भविष्यात आणखी कंपन्या शहर सोडू शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच नहीने हा पुल तयार करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. या ठिकाणी आठ रॅम्प, दोन सर्व्हिस रोड, दोन अंडरपास आणि चार पुलांसह १७ किलोमीटरचा रस्ता तयार केला आहे. त्यानंतर वाहतूक कोंडी कायम असल्याचे सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.