महायुतीत खदखद असल्याची खंत अजित पवार गटाच्या नेत्यानं अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली
Sunil Shelke on Mahayuti Mawal Loksabha Election 2024 : अजित पवार गटाच्या नेत्यानं अप्रत्यक्षपणे बोलून दाखवलं. मावळच्या सभेत बोलताना या नेत्याने आपल्या मनातील खंत बोलून दाखवली आहे. श्रीरंग बारणेंसाठी प्रचारासाठी आयोजित सभेत बोलताना अजित पवार गटाच्या नेत्यानं नेमकं काय म्हटलंय? वाचा सविस्तर...
मावळ लोकसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महायुतीची सभा होत आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणेंसाठी अजित पवार सभा घेतायेत. श्रीरंग बारणेंनी गेल्या लोकसभेत पार्थ पवारांचा दारुण पराभव केला होता. हा पराभव पचवून वडील अजित पवार थेट बारणेंसाठी प्रचारसभा घेतायेत. याच सभेत बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याने मनातील खंत बोलून दाखवली आहे. महायुतीत खदखद असल्याची खंत सुनील शेळकेंनी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवलं. मागील चार वर्षे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष केला. मात्र समीकरणं बदलली आणि आपण हातात हात घालून काम करायला लागलो, असं सुनील शेळके म्हणालेत.
‘ती’ खंत बोलून दाखवली
श्रीरंग बारणे यांना उमेदवारी घोषित केल्यावर मी महायुतीचा धर्म पाळेन, हे ठामपणे जाहीर केलं. अजित दादांच्या सुचनेने आम्ही इमाने इतबारे काम सुरू केलं. पण अनेकांना आश्चर्य वाटलं. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी सुनील शेळके उघडपणे बारणेंना विरोध करत होता. मग अचानक पलटी का घेतली? कारण बारणेंना मी लेखाजोखा मांडायला सांगितला होता, तो त्यांनी मांडला. म्हणूनच आज बारणेंना आम्ही पुन्हा खासदार करण्यासाठी झटत आहोत. महायुतीतील पदाधिकऱ्यांसह कार्यकर्त्यांनी झोकून काम करायला हवं. घराघरात पोहचायला हवं, असं म्हणत सुनील शेळके यांनी महायुतीतील खदखद पुन्हा एकदा बोलून दाखवली.
‘त्या’ कार्यकर्त्यांना तंबी
साडे चार वर्षे खूप संघर्ष पाहिला. मात्र जोपर्यंत माझी नियत साफ आहे, तोपर्यंत माझ्याकडून मावळचा विकास होत राहील. दिवसा धनुष्यबाण आणि रात्री कोणी मशाल करत असेल, तर चार जून नंतर मशाली समोरचे चेहरे कोण होते? हे सुनील शेळके जाहीरपणे सांगणार आहे. जिथं राहायचं तिथं निष्ठेने राहायचा, जिथं शब्द द्यायचा तिथं पक्क राहायचं. हे मी वरिष्ठांकडून शिकलेलं आहे, असं म्हणत दोन्ही पक्षाशी सलगी असणाऱ्या कार्यकर्त्यांना सुनील शेळके यांनी तंबी दिली.
बारामतीचे युवराज सांगतायेत आम्ही शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार घेऊन पुढं चाललो आहे. तेच युवराज भाजप सोबत जाण्यासाठी आग्रही होते. मात्र आज ते निष्ठेची भाषा करतायेत. जेंव्हा बारामती आणि मावळचा निकाल लागेल. तेव्हा आम्ही गुलाल उधळू, त्यावेळी आमच्या सामील होऊ नका. परत म्हणाला आम्ही तुमचेच आहोत, असं सुनील शेळके मावळच्या सभेत म्हणाले.