पुणेकरांना मिळणार वंदे भारत एक्स्प्रेसची भेट, कसा असणार मार्ग?

| Updated on: Jan 31, 2023 | 12:46 PM

उद्घाटनाच्या दिवशी सोलापूर स्थानकातून ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ दुपारी ३ वाजता मुंबईसाठी रवाना होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करणार आहे.

पुणेकरांना मिळणार वंदे भारत एक्स्प्रेसची भेट, कसा असणार मार्ग?
Follow us on

पुणे : भारतीय रेल्वेचा विस्तार वेगाने होत आहे. रेल्वेने सुरु केलेली वंदे भारत एक्स्प्रेस अनेक मार्गावरुन जात आहे. आता पुणेकरांसाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे. मुंबई-पुणे-सोलापूर (Mumbai-Pune-Solapur Route) मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) धावणार आहे.  ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ पुणे रेल्वे स्टेशन (Pune Railway Station) वरुन जाणार आहे.  यामुळे या रेल्वेचा लाभ पुणेकरांना (Punekars) मिळणार आहे. सोलापूरवरुन मुंबई जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) १० फेब्रवारी रोजी करणार आहे.

वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूर ते मुंबई या मार्गावर धावणार आहे. पुणे-सोलापूर दरम्यानच्या पहिल्या एक्स्प्रेसचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १० फेब्रुवारी रोजी होणार आहे. उद्घाटनाच्या दिवशी सोलापूर स्थानकातून ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ दुपारी ३ वाजता मुंबईसाठी रवाना होईल.

ताशी 110 किमी वेग

हे सुद्धा वाचा

पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई ते सोलापूर दरम्यान ताशी 110 किमी वेगाने धावणार आहे. ती पुण्यातून जाणार असल्याने पुणेकरांना ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चा प्रवास अनुभवता येणार आहे.

आठवड्यातून सहा दिवस चालेल

वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूरहून सकाळी 6.50 वाजता सुटेल. पुण्यात सकाळी 9 वाजता पोहचणार आहे. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता मुंबईला पोहचेल. त्याच दिवशी दुपारी 4.10 वाजता ती मुंबईहून निघेल. सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुण्याला पोहचेल. रात्री 10.40 वाजता सोलापूरला पोहचणार आहे. ही सेवा आठवड्यातून सहा दिवस उपलब्ध असेल. ही एक्स्प्रेस बुधवारी मुंबईतून आणि गुरुवारी सोलापूरहून धावणार नाही.

मेक इन इंडिया ट्रेन

देशभरात ही ट्रेन नव्या युगाची ट्रेन मानली जात असून तिला ‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे तिची प्रवासी वाहण्याची क्षमता ही ‘शताब्दी एक्स्प्रेस’ पेक्षा अधिक आहे. पहिली वंदेभारत वाराणसी ते दिल्ली, दुसरी दिल्ली ते काटरा, तिसरी मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, चौथी दिल्ली ते चंदीगड, पाचवी चेन्नई ते म्हैसूर तर सहावी बिलासपूर ते नागपूर दरम्यान सुरू करण्यात आली आहे. वंदेभारतच्या 75 रेकची निर्मिती पहिल्या टप्प्यात होणार असून त्यात जरी चेअरकारचे डबे असले तरी तिची आसने आता अधिक आरामदायी करण्यात आली आहेत.

देशात चार ठिकाणी निर्मिती

पहिली ‘वंदेभारत ट्रेन’ 2018 मध्ये तयार करण्यात आली होती. सध्या देशातील चार रेल्वे कारखान्यात ‘वंदे भारत’ ट्रेनची निर्मिती सुरू असून लातूर येथील नव्या कारखान्यातही तिचे सूटे भाग आणि डबे तयार करण्यात येणार आहे. वंदेभारत ही विनाइंजिनाची 16 डब्यांची ट्रेन असून तिच्या दर एका डब्यामागे एक मोटरकोचचा डबा जोडलेला आहे. त्यामुळे तिच्या पन्नास टक्के चाकांना मोटरची ताकद मिळते. तिचा कमाल वेग प्रति तास 160 कि.मी. इतका आहे. तिच्या मोटरसह सर्व इलेक्ट्रीक पार्ट्स डब्याच्या खालच्या भागात बसविलेले आहेत. ही ट्रेन सुरू होताच अवघ्या सात सेंकदात वेग पकडू शकते.

1128 प्रवासी क्षमता 

या ट्रेनच्या मोटर असलेल्या कोचमध्येही प्रवासी सामावू शकतात. तसेच ही ट्रेन वीजेवर धावणारी असल्याने पॉवर जनरेटर कार जोडायची गरज राहत नाही. त्यामुळे तिची प्रवासी वाहण्याची क्षमता शताब्दी पेक्षा जादा आहे.  एकूण 1128  इतकी प्रवासी क्षमताआहे.