आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत वारकऱ्यांची अजित पवारांसोबत चर्चा, नेमकं काय ठरलं?

| Updated on: May 28, 2021 | 7:59 PM

मागील वर्षी कोरोना संसर्गामुळे वारीला मुकावे लागलेल्या वारकऱ्यांनी यंदा वारीला जाण्याची परवानगी देण्याची मागणी केलीय. या मागणीबाबतच आज (28 मे) वारकरी संप्रदायाचे काही प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले.

आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत वारकऱ्यांची अजित पवारांसोबत चर्चा, नेमकं काय ठरलं?
Follow us on

पुणे : मागील वर्षी कोरोना संसर्गामुळे वारीला मुकावे लागलेल्या वारकऱ्यांनी यंदा वारीला जाण्याची परवानगी देण्याची मागणी केलीय. या मागणीबाबतच आज (28 मे) वारकरी संप्रदायाचे काही प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले. यावेळी अजित पवार यांनी या सर्वांशी चर्चा करत त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. तसेच यावर लवकरच निर्णय घेण्याचं आश्वासन दिलंय. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात अजित पवार यांनी आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा केली. तसेच पालखी सोहळ्याबाबत त्यांची मते जाणून घेतली (Varkari meet Ajit Pawar in Pune to discuss Ashadhi Palakhi Vari Sohala).

“सर्वसामान्य नागरिकांसह, वारकऱ्यांच्या आरोग्याचा विचार आवश्यक”

अजित पवार म्हणाले, “कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी आपण सामना करत आहोत. राज्यातील कोरोना संसर्गाचा आलेख कमी होत असला तरी तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह, वारकऱ्यांच्या आरोग्याचा विचार आपल्याला करणे आवश्यक आहे. वारकरी संप्रदायातील मान्यवरांची मते आज (28 मे) जाणून घेण्यात आली आहेत. वेळप्रसंगी अधिक चर्चा करुन आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबतचा अंतिम निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात येणार आहे.”

“आषाढी वारीची भूमिका मंत्रिमंडळाच्या येत्या आठवड्यातील बैठकीत मांडणार”

“श्री. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासह पंढरपूरच्या आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या वारीला शेकडो वर्षांची पंरपरा आहे, मात्र राज्यात कोरोनाचे संकट आहे, कोरोनासोबतच म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे अशा स्थितीत अत्यंत काळजी घ्यावी लागणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या सव्वा वर्षापासून आपण सर्व धार्मिक कार्यक्रम घरात राहूनच साजरे केले आहेत. आषाढी वारीची पंरपरा जपण्यासाठी आपण सर्वांनी मांडलेली भूमिका मंत्रिमंडळाच्या येत्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत मांडण्यात येईल,” असंही अजित पवार यांनी सांगितलं.

“गेल्यावर्षी राज्य सरकारच्या आवाहनाला वारकरी संप्रदायाने चांगला प्रतिसाद”

“मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत सर्वानुमते अंतिम निर्णय घेण्यात येईल. गेल्यावर्षी राज्य सरकारच्या आवाहनाला वारकरी संप्रदायाने चांगला प्रतिसाद दिला, ही कौतुकास्पद बाब आहे,” असंही पवारांनी या भेटीत नमूद केलं. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, यांनीही वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी संवाद साधला. यावेळी संस्थानच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली. वारकरी संप्रदायातील मान्यवरही येथे उपस्थित होते.

यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (व्हीसीद्वारे), आमदार अतुल बेनके, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते. तर व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंग, सोलापूर जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, देहू संस्थानचे विश्वस्त माणिक मोरे, नितीन मोरे, पालखी सोहळा प्रमुख संजय मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अँड विकास ढगे-पाटील, अभय टिळक यांच्यासह राज्यभरातील वारकरी संप्रदायातील पालखी सोहळा प्रमुख व मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा :

विठुराया चंद्रभागेतील विष्णुपद मंदिरात वास्तव्याला! आख्यायिका काय?

पंतप्रधानांनीही पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली, तेव्हा त्यांचा धर्म भ्रष्ट झाला का? संजय गायकवाड यांचा वारकऱ्यांना सवाल

प्रशासनानं वारकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला, बंडातात्या कराडकर यांच्याकडून देहूच्या वेशीवरील आंदोलन स्थगित

व्हिडीओ पाहा :

Varkari meet Ajit Pawar in Pune to discuss Ashadhi Palakhi Vari Sohala