Pune old wadas : वाड्याची भिंत कोसळल्यानं नातेवाईकांकडे राहण्याची वेळ, जुन्या वाड्यांकडे पालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचा रहिवाशांचा आक्षेप

माझ्या विनंत्या किंवा पीएमसी इमारत बांधकाम विभागाला आम्ही पाठवलेल्या अधिकृत पत्रांकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्याऐवजी भिंत कोसळली तर येऊ असे सांगितले आणि शेवटी भिंत कोसळली, असे रहिवाशांनी सांगितले.

Pune old wadas : वाड्याची भिंत कोसळल्यानं नातेवाईकांकडे राहण्याची वेळ, जुन्या वाड्यांकडे पालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचा रहिवाशांचा आक्षेप
जुन्या वाड्याची पडलेली भिंत
Image Credit source: HT
| Updated on: Jul 27, 2022 | 10:11 PM

पुणे : गुरुवार पेठेतल्या जुन्या वाड्याची भिंत कोसळल्याची (Wada wall collapsed) घटना घडली. त्यामुळे येथील एका रहिवाशाला कुटुंबासह नातेवाईकांकडे राहावे लागले आहे. येथील वाड्याच्या धोकादायक भागाबाबत पुणे महानगरपालिका (PMC) आणि स्थानिक नगरसेवकांकडे गेल्या एक महिन्यापासून वारंवार तक्रारी करण्यात येत आहेत. त्यात सोमवारी रात्री वाड्याची एक बाजूची भिंत कोसळली. त्यामुळे श्रीपाद नवगिरे आणि त्यांच्या कुटुंबीयांना रात्रभर नातेवाइकांच्या घरी राहावे लागले, कारण आता स्वतःच्या वाड्यात झोपणे सुरक्षित राहिले नाही. गुरुवार पेठ (Guruwar peth) परिसरातील गौरे आळीमध्ये आमचा जुना वाडा आहे आणि आमच्या गल्लीत एका रांगेत अनेक जुने वाडे आहेत. मागील एक महिन्यापासून, आम्ही या समस्येबद्दल आणि शेजारच्या वाड्यापासून आमच्या वाड्याला धोका असल्याबद्दल तक्रार करत आहोत. शेवटची भिंत तर पूर्णत: आमच्या वाड्याकडे झुकलेली आहे, असे नवगिरे म्हणाले.

‘सर्व काही कोलमडले’

पीएमसीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे लक्ष दिले नाही आणि काल रात्री ती भिंत आमच्या घरावर पडली. मी काही महिन्यांपूर्वी नवीन टिनपत्रे लावली होती पण सर्व काही कोलमडले, असेही एका खाजगी कंपनीत काम करणारे 32 वर्षीय नवगिरे म्हणाले. गुरुवार पेठेतील वाडे असलेली गल्ली ही अरुंद आहे. तिथे रोजचा भाजीबाजार सकाळी सुरू होतो आणि दिवसभर मोठी गर्दी असते. गेल्या महिनाभरात पीएमसी इमारत बांधकाम विभागाने जुन्या शहरातील शेकडो धोकादायक वाड्यांना नोटीस बजावल्या होत्या. दरम्यान, हे वाडे धोकादायक असून ते कधीही कोसळू शकतात, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

‘पत्रांकडे कोणीही लक्ष दिले नाही’

माझ्या विनंत्या किंवा पीएमसी इमारत बांधकाम विभागाला आम्ही पाठवलेल्या अधिकृत पत्रांकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्याऐवजी भिंत कोसळली तर येऊ असे सांगितले आणि शेवटी भिंत कोसळली. त्यानंतर पीएमसीच्या अधिकाऱ्यांनी येऊन भिंत आणि आमच्या वाड्याचा वरचा भाग काढून टाकला. मात्र सगळा मलबा तसाच पडून आहे. आमच्या नुकसानाची भरपाई कोण करणार, असा सवाल त्यांनी केला आहे.

‘…तर त्याची जबाबदारी पीएमसीची’

शेजारी राहणारे आणखी एक रहिवासी म्हणाले, की आम्ही सर्व रहिवाशांनी या गल्लीतील धोकादायक वाड्यांबाबत वारंवार तक्रारी केल्या आहेत, परंतु कोणीही येथे येऊन दुरुस्तीचे काम करण्यास तयार नाही. अशा मुसळधार पावसात रहिवाशांची काळजी घेणे ही पीएमसीची जबाबदारी आहे आणि जर कोणाचा जीव गेला तर त्याची जबाबदारी पीएमसीची असेल. मंगळवारी मात्र पीएमसीचे अधिकारी आणि इमारत बांधकाम विभागातील अभियंत्यांनी घटनास्थळी भेट दिली, असे येथील रहिवाशांनी सांगितले.