लाखो हृदयांची धडधड, शांतता आणि सद्भावनेचा दीपस्तंभ ठरले BAPS Hindu Mandir
अबू धाबीतील BAPS हिंदू मंदिराने दोन वर्षे पूर्ण केली आहेत. या काळात ४० लाखांहून अधिक भाविकांनी भेट दिली असून ते शांतता, सांस्कृतिक ऐक्य आणि जागतिक सद्भावनेचे केंद्र बनले आहे. वर्धापन दिन सोहळ्यात 'मंदिर: आपले कुटुंब, आपले भविष्य' हा संदेश दिला गेला. हे मंदिर केवळ पूजास्थान नसून समाजाला जोडणारे आणि प्रेरणा देणारे एक शक्तीस्थान आहे.

अबू धाबी येथील BAPS Hindu Mandir ने 14 फेब्रुवारी 2026 रोजी स्थापनेची दोन वर्षे पूर्ण केली. या दोन वर्षांत हे मंदिर आध्यात्मिक सेवा, सांस्कृतिक ऐक्य आणि जागतिक सौहार्द यांचे तेजस्वी केंद्र म्हणून उदयास आले आहे. परम पूज्य Mahant Swami Maharaj यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या दिव्य मंदिरात आतापर्यंत 100 हून अधिक देशांतील ४० लाखांपेक्षा अधिक भाविक आणि अभ्यागतांनी भेट दिली आहे.
विशेष वर्धापन दिन सोहळ्यात 8000 हून अधिक भक्त, मान्यवर, राजनयिक आणि कुटुंबीय सहभागी झाले. कार्यक्रमाची थीम होती — “मंदिर: आपले कुटुंब, आपले भविष्य.” या उपक्रमातून मंदिर हे केवळ पूजास्थान नसून कुटुंबांना बळ देणारी, समाजाला जोडणारी आणि विविध संस्कृतींमध्ये सद्भाव निर्माण करणारी सजीव संस्था असल्याचा संदेश देण्यात आला.
स्वामी ब्रह्मविहारिदासजी यांचं भाषण
Mahant Swami Maharaj यांचे प्रतिनिधी म्हणून स्वामी ब्रह्मविहारिदासजी यांनी प्रमुख भाषण केले.“ बालक एका वर्षात चालायला शिकतं, पण दोन वर्षांत बोलायला लागतं. त्याचप्रमाणे मंदिराने आता जगाशी संवाद सुरू केला आहे — आणि त्याचा संदेश आहे सद्भाव.” असं ते म्हणाले. त्यांचा हा संदेश जगभरातून आलेल्या राजदूत, धर्मगुरू, पर्यटक आणि समुदाय प्रतिनिधी यांच्या मनात समान स्वरात घुमला.
या प्रसंगी यूएईमध्ये सांस्कृतिक ऐक्य आणि एकतेचे समर्थक माननीय Sheikh Nahyan bin Mubarak Al Nahyan यांचा सन्मान करण्यात आला. आपल्या भाषणात त्यांनी मंदिराला “सामायिक मानवी मूल्यांचे प्रभावी प्रतीक” असे संबोधले. तसेच ते भारत व संयुक्त अरब अमीरात यांच्यातील दृढ व शाश्वत मैत्रीचे प्रतिबिंब आहे, असंही त्यांनी सांगितलं. पुढील पिढ्यांना आध्यात्मिक बळ, नैतिक मार्गदर्शन आणि सामुदायिक उन्नती देत राहील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
हे मंदिर आध्यात्मिक घर
कार्यक्रमात “मंदिर संवाद” या विशेष मालिकेचे सादरीकरण करण्यात आले, ज्यामध्ये मंदिराच्या जागतिक आणि सामाजिक प्रभावावर प्रकाश टाकण्यात आला. राजनयिक प्रतिनिधींनी याला परंपरा आणि आधुनिक कूटनीती यांमधील सेतू असे वर्णन केले. अनेक कुटुंबांनी सांगितले की हे मंदिर त्यांच्यासाठी आध्यात्मिक घर बनले आहे, जिथे परंपरा मुक्तपणे जगल्या जातात आणि सेवेद्वारे कौटुंबिक नाते अधिक दृढ होतात.
बालकांनी चार सामूहिक संकल्प मांडले — स्वतःमध्ये सकारात्मकता, कौटुंबिक मूल्यांचे जतन, राष्ट्रीय सद्भाव आणि पर्यावरणीय जबाबदारी — जे मंदिराची भावी पिढ्यांप्रती असलेली बांधिलकी दर्शवतात. परंपरागत शिल्पकला आणि आधुनिक शाश्वततेचा अद्वितीय संगम सादर करणारे हे मंदिर सभ्यतांच्या सहकार्याचे जिवंत उदाहरण आहे. मात्र, त्याची खरी ताकद त्याच्या प्रभावात आहे — श्रद्धेला प्रेरणा देणे, कुटुंबांना सशक्त करणे, समाजाची सेवा करणे आणि जगात शांतता व सद्भाव वाढवणे.
श्रद्धा, सेवा आणि एकतेच्या माध्यमातून अधिक आशावादी आणि समरस जगाची निर्मिती शक्य आहे असा विश्वास तिसऱ्या वर्षात पदार्पण करणाऱ्या BAPS हिंदू मंदिराला आहे.
