Mumbai Rain : राज्यात कोणत्या जिल्ह्यात काय अलर्ट, मुंबईसाठी काय दिला इशारा

Mumbai Rain : राज्यात मान्सून दाखल झाला आहे. परंतु गेल्या दोन, तीन दिवसांपासून अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. राज्यात आगामी दोन, तीन दिवसांत कसा पाऊस पडणार? यासंदर्भात हवामान विभागाने माहिती दिली आहे.

Mumbai Rain : राज्यात कोणत्या जिल्ह्यात काय अलर्ट, मुंबईसाठी काय दिला इशारा
| Updated on: Jul 05, 2023 | 1:12 PM

पुणे : महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. २५ जून रोजी मान्सून दाखल झाल्यानंतर मुंबई, पुणे शहरात चांगला पाऊस झाला. परंतु गेल्या दोन तीन दिवसांपासून अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. आता हवामान विभागाने मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. मुंबईत पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पुढील चार दिवस महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात पावसाचा इशारा पुणे हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

कुठे काय आहे अलर्ट

हवामान खात्याने मुंबईसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मुंबई हवामान विभागाच्या प्रादेशिक केंद्राने 5 जुलैसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ आणि 6-7 जुलैसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केली आहे. दुसरीकडे, उर्वरित जिल्ह्यांबद्दल अंदाज वर्तवला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे गुरुवारी पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. तसेच साताऱ्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने व्यक्त केली आहे.

ठाणे जिल्ह्यात पाऊस

ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरु आहे. शहापुरात गेली अनेक दिवस सातत्याने पाऊस पडत असल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. बुधवारी सकाळी शहापूर अन् परिसरात जोराचा पाऊस झाला. यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी अन् कामावर निघालेल्या चाकरमांन्याना पावसापासून वाचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. या पावसामुळे शेतकऱ्यांनी शेती कामांना वेग दिला आहे.

राज्यात यंदा मान्सून उशिराने आला. दरवर्षी राज्यात मान्सून सात जून रोजी दाखल होतो. परंतु यंदा मान्सून उशिराने आला. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून २५ जून रोजी महाराष्ट्रात दाखल झाला. राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी अजून सर्वच जिल्ह्यात मुबलक पाऊस झालेला नाही. अजून अनेक जिल्ह्यांत चांगल्या पावसाची गरज आहे.