Rain | राज्यात हिवाळ्यात यलो अन् ऑरेंज अलर्ट, तीन दिवस पाऊस

IMD Rain News | राज्यात पुढील काही दिवस पाऊस पडणार आहे. हवामान विभागाने यासाठी पुढील तीन दिवस यलो किंवा ऑरेंज अलर्ट दिला आहे. हिवाळी मोसमी वारा व चक्रीय वाऱ्यांच्या परिस्थितीमुळे पाऊस पडणार आहे. सध्या या परिस्थितीमुळे तामिळनाडू आणि केरळमध्ये पाऊस सुरु आहे.

Rain | राज्यात हिवाळ्यात यलो अन् ऑरेंज अलर्ट, तीन दिवस पाऊस
| Updated on: Nov 25, 2023 | 11:20 AM

पुणे, दि. 25 नोव्हेंबर 2023 | राज्यात हिवाळा सुरु झाला आहे. अनेक शहरांमध्ये गुलाबी थंडी जाणवू लागली आहे. आता राज्यात हिवाळ्यात पावसाचा अलर्ट आला आहे. राज्यात चार दिवस कुठे यलो आणि कुठे ऑरेंज अलर्ट दिला आहे. 25 ते 26 नोव्हेंबर दरम्यान या तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता पुणे हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच काही ठिकाणी गारपीट तसेच वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार आहे. परंतु खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांनी शेतात आपला कापूस किंवा इतर काही माल ठेवला असेल तर त्याची व्यवस्थित काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

कोणत्या जिल्ह्यांत अलर्ट

मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील अनेक भागांत पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. मध्य महाराष्ट्रातील फक्त जळगाव जिल्ह्यात कोणताही अलर्ट नाही. विदर्भातील नागपूर, वर्धा जिल्हा वगळता इतर ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. कोकणातही २५ नोव्हेंबरसाठी यलो अलर्ट असणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. २६ नोव्हेंबर रोजी राज्यातील इतर जिल्ह्यात यलो अलर्ट असणार आहे. २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी संपूर्ण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट असणार आहे.

रब्बी पिकाला होणार फायदा

देशात सध्या हिवाळी मोसमी वारे व चक्रीय वाऱ्यांच्या परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तामिळनाडू आणि केरळमध्ये पाऊस पडत आहे. मोसमी वारे महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टीकडे आगेकूच करणार आहे. यामुळे महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे. या पावसाचा रब्बी पिकास फायदा होणार आहे. यंदा देशात आणि राज्यात सरासरी पाऊस पडला नाही.  यामुळे धरणांमध्ये पुरेसा जलसाठा नाही. परंतु आता नोव्हेंबर महिन्यात पडणाऱ्या पावसामुळे पिकांची वाढ जोमाने होईल आणि उत्पन्न वाढणार आहे.