IMD Rain Alert : 18,19,20,21,22 या तारखेला आकाशात काळे ढग, कुठं धो धो… कुठं ऊन? पावसाचा ताजा अंदाज समोर
IMD Rain Alert : हवामान विभागाकडून पावसाबाबतचा नवा अंदाज समोर आला आहे. या अंदाजानुसार राज्यात पुढील पाच दिवस मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पावसाच्या सरी कोसळताना पहायला मिळत आहे. खासकरून घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमधील नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे. अशातच आता हवामान विभागाकडून पावसाबाबतचा नवा अंदाज समोर आला आहे. या अंदाजानुसार राज्यात पुढील पाच दिवस मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. राज्याच्या कोणत्या भागात कसे हवामान असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पुढील 5 दिवस पावसाची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 5 दिवसांत राज्यातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता. 5 दिवसांच्या कालावधीनंतरही अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या काळात घाटमाथ्यावर मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज
नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ प्रवीण कुमार यांनी सांगितले की, पुढील चार ते पाच दिवस विदर्भात पावसाची स्थिती सामान्य राहणार असल्याचा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. 1 जूनपासून आजपर्यंत नागपूर शहरात सरासरीच्या तुलनेत 25 टक्के कमी पावसाची नोंद तर विदर्भात 18 टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. एल निनो चा प्रभाव पावसावर दिसून येत आहे. बनत असलेली हवामान प्रणाली कमजोर ठरत आहे त्यामुळे पाऊस कमी होत आहे.
देशाच्या कोणत्या भागात कसे हवामान?
हवामान विभागाने 18 ऑगस्ट रोजी देशातील अनेक भागांमध्ये जोरदार वादळ, पाऊस आणि पुराचा इशारा जारी केला आहे. बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे झारखंड, ओडिशा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा जोर पाहायला मिळू शकतो.
झारखंड, ओडिशा, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आणि पाणी साचण्याचा गंभीर धोका हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याशिवाय उत्तर भारतातील दिल्ली, लखनऊ, शिमला आणि देहराडून यांसारख्या प्रमुख शहरांसह 7 पेक्षा अधिक शहरांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
