मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या मेळाव्यातून आपले पत्ते ओपन केले आहेत. राज ठाकरे यांनी केवळ मोदीसाठी महायुतीला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं. आपल्या देशाला खंबीर नेत्याची गरज असल्यानेच हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच मनसैनिकांना लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. मला जी भूमिका मांडायची ती मांडली आहे. आता यावरही कुणी पकपक केली तर मग माझी दारं, खिडक्या मी उघडणार आहे, असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला.
शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. ही भूमिका मांडत असतानाच त्यांनी मनसैनिक आणि राज्यातील मतदारांना हातजोडून कळकळीचं आवाहनही केलं. या महाराष्ट्रातून पुढे जाताना आपल्याला मार्ग काढायचा आहे. आपल्या महाराष्ट्र सैनिकांवर माझा विश्वास आहे. आपण राज्याला योग्य मार्ग दाखवू. माझी महाराष्ट्राकडून अपेक्षा आहे. मतदारांकडूनही अपेक्षा आहे. कृपा करून (हात जोडून) व्याभिचाराला राज मान्यता देऊ नका. ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे. त्याला राजमान्यता मिळाली तर पुढचे दिवस भीषण आहेत, असं राज ठाकरे म्हणाले.
आजच्या परिस्थितीत मी पाहतो. तेव्हा पुढच्या 50 वर्षाचा विचार करायचा असतो. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. म्हटलं वाटाघाटीत मला पाडू नका. मी तुम्हाला आज सांगतो. राज्यसभा नको आणि विधान परिषद नको. पण या देशाला चांगल्या नेत्याची गरज आहे. त्याच्याकडून अपेक्षा आहे. त्या पूर्ण झाल्या नाही तर राज ठाकरेंचं तोंड आहेच. मला काही अपेक्षा नाही. मनसे भाजप, शिवसेना आणि एनसीपीला फक्त मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे. हे मी जाहीर करतो, असं राज ठाकरे म्हणाले.
सर्व मनसैनिकांना एकच सांगतो. विधानसभेच्या कामाला लागा. जोरात विधानसभेच्या तयारीला लागा. पुढच्या गोष्टी पुढे. मी लवकर तुम्हाला भेटायला येत आहे. मला मांडायचं असेल तर मांडेल. कुणाची पकपक झाली. तर उद्या दारं खिडक्या उघडणार आहे, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.