कर्नाटकात जे होऊ शकतं, ते महाराष्ट्रात का नाही? शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून रोहित पवारांचा सरकावर हल्लाबोल

शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून रोहित पवार आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी धाराशिवमध्ये पाहणी केली. त्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना लवकर मदत करावी, अशी मागणी रोहित पवारांनी केली.

कर्नाटकात जे होऊ शकतं, ते महाराष्ट्रात का नाही? शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून रोहित पवारांचा सरकावर हल्लाबोल
| Updated on: Sep 20, 2026 | 9:35 AM

महाराष्ट्रात पावसाअभावी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार ठिकठिकाणी पाहणी करत आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील येरमाळा परिसरात रोहित पवार दुष्काळ पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून रोहित पवार यांनी फडणवीस सरकारवर टीका केली. कर्नाटकात जे होऊ शकते, ते महाराष्ट्रात होत नाही. सरकार फोडाफोडी करण्यात व्यग्र असल्याची टीका रोहित पवारांनी केली.

रोहित पवार म्हणाले, ‘शेतामध्ये काहीच राहिलं नाही. सोयाबीनचं पीक 100 टक्के गेलं आहे. काही प्रमाणात पाऊस पडला. परंतु नुकसान झालं, ते झालंच आहे. आम्हाला कमीत कमी हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळाले पाहिजे, अशी शेतकऱ्यांची माहिती आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली. त्याचे पैसे मिळाले नाही. कोणाला हजार,तर कोणाला दोन हजार मिळाले आहेत. काहींना बारा हजार हेक्टरी मिळाले आहेत. मुख्यमंत्र्‍यांनी हेक्टरी साडे सतरा हजार रुपये हे विम्याचे अतिवृष्टीचे मिळतील, असे सांगितले. ते अजून मिळाले नाहीत. ते मिळायला हवे. सुरुवातीला फसवी कर्जमाफी केली. त्यासाठी आंदोलन करावं लागले. आम्हाला उपोषण करावं लागलं. त्यानंतर अटी काढल्या. दुर्दैव असे की, एकाही शेतकऱ्याला पैसे आले नाही.

‘आतापर्यंत बारा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. म्हणजे 10 हजार रुपयांचं वाटप झालं. आता 43 लाख शेतकरी राहिले आहेत. त्यांना मदत मिळणे महत्वाचे आहे. जनावरांना चारा नाही. चारा छावण्या सुरू झाल्या पाहिजे. अशी देखील शेतकऱ्यांची माहिती आहे. एका मजुराच्या कुटुंबाला प्रत्येकी 25 हजारांची मागणी केली. शेतात काम नसेल तर मजूर काय करणार? ती मागणी महत्वाची आहे. शेतकऱ्यांना मदत मिळणे महत्त्वाचे आहे. विम्याचे पैसे मिळाले पाहिजे. विमा आणि दुष्काळाचे पैसे मिळाले पाहिजे. बाकीचे राज्य पुढे गेले. कर्नाटकात दुष्काळ जाहीर झाला. खास अधिवेशन घेत आहेत. मी मुख्यमंत्र्‍यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. तामिळनाडूमध्ये जून महिन्यात शेतकर्‍यांना पॅकेज जाहीर झालं. फडणवीस सरकार 5 ऑक्टोबरची वाट का पाहत आहे? एनडीआरएफचे पैसे हवे असेल, शिष्टमंडळ घेऊन जावा. शरद पवार देखील तुमच्यासोबत येतील. मोठे पॅकेज घ्या. सामान्य शेतकऱ्यांकडे मजुराकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केला.

‘महाराष्ट्राचं सरकारला वाटत आहे की, आमदार खासदाराला फोडलं तर लोकांची काय गरज आहे. त्यामुळे सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष आहे. कर्नाटक राज्य आपल्यापेक्षा छोटे राज्य आहे. तिथे पंचनामे करण्याचे आदेश दिले. आता खास अधिवेशन घेत आहे. आता एक शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटायला जाणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात वेळ न दवडता चारा छावणी, विमा पैसे, शेतकरी, मजुरांना मदत करा. विद्यार्थ्यांना फी सवलत द्यावी, असे रोहित पवार यांनी पुढे सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us