
मुंबईसह महाराष्ट्रात फक्त पैशांचेच राज्य आले आहे आणि महानगरपालिका निवडणुकांतून हे स्पष्ट झाले आहे. भाजप व शिंदे यांनी मिळून महाराष्ट्राच्या निवडणुका विकृत पातळीवर नेऊन ठेवल्या आहेत. मुंबईसह २९ महानगरपालिकांचे निकाल लागून जुने झाले असले तरी, मुंबईत शिवसेना-मनसेची सत्ता आली नसली, तरी भाजपच्या सत्तेवर अंकुश राहील इतके शंभरावर नगरसेवक विरोधी पक्षांचे निवडून आले आहेत. मुंबईतील मराठी माणसांनी ठाकरे ब्रॅण्डला भरघोस मतदान केले हे नक्की असले, तरी सत्ताधाऱ्यांनी मात्र मुंबईसह सर्वच महानगरपालिकांत विरोधकांचा विजय चोरला आहे, असा आरोप रोखठोकमधून करण्यात आला आहे.
शिवसेनेच्या सामना रोखठोकमधून महापालिका निवडणुकींबद्दल भाष्य करण्यात आलं आहे. महानगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचा विजय झाला नसून तो चोरला गेला आहे, असा आरोप करण्यात आला आहे. जळगावमध्ये शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील निवडून आले असतानाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने निकाल जाहीर करण्यास विलंब केला. ईव्हीएममधील आकडा स्पष्ट असतानाही दुसऱ्याच उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आले. फेरमतमोजणीची मागणी केली असता उमेदवारांना पोलीस बळाचा वापर करून केंद्राबाहेर काढण्यात आले आणि लाठीमार करण्यात आला, असा आरोप रोखठोकमधून करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे पुण्यात वसंत मोरे यांच्या प्रभागात मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात अचानक ईव्हीएम मशीन बंद पडल्याचे सांगण्यात आले. नवीन मशीनमध्ये जुनी चिप घालून मते मोजली गेली आणि मोरे यांना पराभूत घोषित केले गेले. धक्कादायक बाब म्हणजे, जाहीर झालेली एकूण मते आणि मोजलेली मते यामध्ये ११०० मतांची तफावत आढळली, असेही सामनात म्हटले आहे.
महापालिका निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने झाल्या नाहीत. निवडणूक यंत्रणा सरळ विकली गेली. पोलिसांवर दबाव होताच. निवडणुकीआधी सत्ताधाऱ्यांनी 70 नगरसेवक बिनविरोध निवडून आणले व निकालानंतर जे निवडून आले त्यातले बरेच जण पैशांच्या जोरावर गळाला लावले व जे गेले तेही शहराच्या विकासाच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांना फितूर झाले. कल्याण-डोंबिवली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू पाटील हे शिंदे गटाविरुद्ध लढले व निकाल लागताच सरळ त्याच शिंदे गटाबरोबर गेले. सध्याच्या राजकारणात कोणीही कोणाचा राहिलेला नाही. राजू पाटील आता ‘विकास’ या मुद्द्यावर शिंदे गटाबरोबर गेले. विकासाच्या नावाखाली लोकशाहीला आणखी काय काय सहन करावे लागणार आहे? असा सवाल सामनातून विचारण्यात आला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अरेरावीला व घाणेरड्या राजकारणाला कंटाळून राजू पाटील यांनी मनसेला शिंदेंच्या गोटात फरफटत नेले. रवींद्र चव्हाण हे खालच्या पातळीवरचे राजकारण करतात. त्यांना धडा शिकवण्यासाठी मनसेने कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटास पाठिंबा दिला. यात ‘विकास’ हा मुद्दा येतो कोठे? असल्या घाणेरड्या राजकारणात ‘विकास’ शब्द बदनाम झाला. अजित पवारांपासून अशोक चव्हाणांपर्यंत भाजपच्या वाशिंग मशीनमध्ये गेलेले सर्वच लोक ‘विकासा’च्या नावाखाली पक्ष सोडून गेले. ‘विकास’ या शब्दावर बंदी आणावी असा हा सगळा प्रकार. सध्याच्या राजकारणात मानसिक अस्थिरता व मनोरुग्णांचे प्रमाण वाढले आहे. काही देत असाल तरच पक्षात राहतो, नाहीतर जातो असे पक्षनेतृत्वाला सांगणाऱ्या उंदरांचा सुळसुळाट वाढला आहे, अशी बोचरी टीका यावेळी करण्यात आली.
मुंबईच्या महापौरपदासाठी शिंदे गट दिल्लीत फेऱ्या मारत आहे, यावर नाराजी व्यक्त करताना म्हटले आहे की, शिवसेना म्हणवून घेणारे महापौर पदासाठी दिल्लीत येरझाऱ्या घालतात यातच बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान आहे. निवडणुकीत उमेदवारांना पाच-पाच कोटी रुपये दिले गेले, ही लोकशाहीसाठी घातक असून भ्रष्ट पैशांतून राज्यव्यवस्था विकत घेतली जातेय, असा गंभीर आरोप या लेखात करण्यात आला आहे.