श्यामाप्रसाद मुखर्जींबाबत बोलायला लावू नका… संजय राऊत यांचा इशारा, थेट ब्रिटिशांशी जोडला संबंध
संजय राऊत माध्यमांशी बोलताना खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रेरणास्थान डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यावरून भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घ्या...

पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालांनंतर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेचे (UBT) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रेरणास्थान डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यावरून भाजपवर टीका केली आहे. “श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याविषयी मला सत्य बोलायला लावू नका,” असा इशारा देत राऊत यांनी त्यांच्यावर ब्रिटिशांशी संगनमत केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
स्वातंत्र्य आंदोलनाला विरोध केल्याचा आरोप
संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ज्यांनी कोलकात्यामध्ये मुस्लिम लीगच्या सरकारमध्ये सहभागी होऊन स्वातंत्र्य आंदोलनाला विरोध केला होता, त्यांच्याविषयी भाजपने न बोललेलेच बरे. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या आत्म्याला शांतता मिळणार असेल तर मिळू द्या, पण त्यांच्या इतिहासाचे वाभाडे काढायला लावू नका असे ते म्हणाले.
राऊत यांनी पुढे, कलकत्ता विश्वविद्यालयामध्ये युनियन जॅक फडकवून ब्रिटिशांच्या त्या झेंड्याला सॅल्युट मारण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना श्यामाप्रसाद मुखर्जी यांनीच जबरदस्ती केली होती. भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने राष्ट्रवादाची व्याख्या बदलली आहे, त्याच पद्धतीने आज मोदी सुद्धा ट्रम्पला सॅल्युट मारत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
मोदींच्या विजयाचा शेअर बाजारावर परिणाम?
देशातील आर्थिक परिस्थिती आणि शेअर बाजारातील घसरणीवरूनही राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले, ज्या क्षणी मोदी जिंकल्याची बातमी आली, त्याच क्षणी भारताचा शेअर बाजार कोसळला आणि रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली. रुपया डॉलरच्या तुलनेत ९६ वर येऊन ठेपला आहे. ही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा आहे.
‘मोदींनी खरं बोलायला शिकावं’
बंगालच्या निकालांचा संदर्भ देत राऊत यांनी सांगितले की, बंगालमधील विजयाची बातमी येताच रुपया साडे ९५ ते ९६ रुपयांपर्यंत लुडकला. मोदींनी आता तरी खरं बोलायला शिकलं पाहिजे. त्यांनी स्वतः खरं बोलण्याचे धडे घेतले पाहिजेत आणि आपल्या सहकाऱ्यांनाही ते दिले पाहिजेत, असा सल्ला राऊत यांनी दिला.