Special Report : शिवसेना कुणाच्या हाती जाणार?; संजय राऊत म्हणतात, “निवडणूक आयोगावर…”
शिवसेनेतून बाहेर पडलेल्या १६ आमदार अपात्र ठरविण्याची शक्यता जास्त असल्याचं कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांना वाटतं. म्हणून निवडणूक आयोगानं निर्णय देण्याची घाई करू नये, असंही त्यांच मत आहे.
मुंबई : शिवसेना कुणाची यावरून केंद्रीय निवडणूक आयोगात युक्तिवाद संपला. ३० जानेवारीला आता आयोग निकाल देण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगावर दबाव असल्याचं संजय राऊत म्हणाले. निवडणूक आयोगात ठाकरे आणि शिंदे गटाचा युक्तिवाद पूर्ण झालाय. सोमवारी दोन्ही गटाला लिखित युक्तिवाद सादर करायचा आहे. ३० तारखेच्या सुनावणीत थेट निकालचं येण्याची शक्यता आहे. शिवसेना आमचीच असा दावा ठाकरे आणि शिंदे अशा दोन्ही गटांनी केला आहे.
ठाकरे यांची कार्यकारिणी घटनेप्रमाणे असून ती बरखास्त होऊ शकत नाही, असं ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल म्हणाले. पक्ष संघटनात्मक संख्याबळ आणि आमदार-खासदार वेगळे आहेत, असंही ठाकरे गटाचे म्हणणं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत फूटच पडली, असा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. लोकसभा, विधानसभेचे सदस्य पाहता चिन्ह आम्हालाचं द्या, असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केलाय.
जे काही कायद्यानुसार आणि नियमानुसार व्हावं, अशी आमची अपेक्षा असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ३० जानेवारीला निवडणूक आयोग शिवसेना आणि धनुष्यबाणाचा निकाल सुनावणार की, खंडपीठाकडून अपात्रतेचा निकाल येईपर्यंत आयोग निकाल राखून ठेवणार असा प्रश्न आहे.
एखाद्या पक्षात फूट पडली, तर कोणत्या गटाला मान्यता द्यायची हे निवडणूक आयोग ठरविते. पण, सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. निकाल लावण्याचे काम सर्वोच्च न्यायालयाकडे आहे.
शिवसेनेतून बाहेर पडलेल्या १६ आमदार अपात्र ठरविण्याची शक्यता जास्त असल्याचं कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांना वाटतं. म्हणून निवडणूक आयोगानं निर्णय देण्याची घाई करू नये, असंही त्यांच मत आहे.