साडे दहा हजार एसटी कर्मचाऱ्यांचे परतीचे दोर तुटले?, आगार प्रमुखांकडून रुजू करुन घेण्यास नकार!

| Updated on: Jan 01, 2022 | 7:21 PM

सुनावण्यांना हजर राहिले नाहीत म्हणून 700 कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर अनेक एसटी कर्मचारी आगारात जात कामावर रुजू करुन घेण्याची विनंती करत आहेत. मात्र, मध्यवर्ती कार्यालयानं याबाबत सूचना केली नसल्याचं सांगत आगारप्रमुखांनी त्यांना रुजू करुन घेण्यास नकार दिलाय.

साडे दहा हजार एसटी कर्मचाऱ्यांचे परतीचे दोर तुटले?, आगार प्रमुखांकडून रुजू करुन घेण्यास नकार!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

मुंबई : राज्य शासनात विलीनीकरण्याच्या मागणीसाठी दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) सुरु आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी पगारवाढीची घोषणा केल्यानंतरही एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. अशावेळी साडे दहा हजार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. याबाबतच्या सुनावण्यांना हजर राहिले नाहीत म्हणून 700 कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर अनेक एसटी कर्मचारी आगारात जात कामावर रुजू करुन घेण्याची विनंती करत आहेत. मात्र, मध्यवर्ती कार्यालयानं याबाबत सूचना केली नसल्याचं सांगत आगारप्रमुखांनी त्यांना रुजू करुन घेण्यास नकार दिलाय.

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेत कामावर रुजू होण्याची विनंती वारंवार करण्यात येत आहे. दुसरीकडे आवाहन करुनही हजारो कर्मचारी संपावर ठाम असल्यानं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. महामंडळाच्या शिस्त आवेदन कार्यपद्धतीनुसार निलंबित कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई सुरु आहे. तर दोन महिन्यांपासून संप सुरु आहे, राज्य सरकार विलीनीकरणाची मागणी मान्य करत नाही. त्यामुळे अनेक एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलीय. अशावेळी हे कर्मचारी कामावर रुजू करुन घेण्याची मागणी करत आहेत. मात्र, आता आगारप्रमुखांकडून त्यांना कामावर रुजू करुन घेण्यास नकार देण्यात आला आहे. त्यामुळे या एसटी कर्मचाऱ्यांचे परतीचे दोर तुटल्याची चर्चा आता सुरु आहे.

एसटी कर्मचारी आंदोलनाला कोरोनाचा फटका

राज्यात काल 8 हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर एकट्या मुंबईत साडे पाच हजाराच्या घरात रुग्ण आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. कोरोना प्रादुर्भावाचा फटका आता एसटी कर्मचाऱ्यांना बसतोय. आझाद मैदानावर मागील दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. मात्र, राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांकडून जाहीर करण्यात आलेल्या नव्या नियमावलीनुसार या कर्मचाऱ्यांना ठराविक वेळेसाठी आझाद मैदान सोडावं लागणार आहे.

दुखवटा सुरुच राहणार

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचा दुखवटा सुरुच राहणार असल्याचं या कर्मचाऱ्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं. सरकारच्या नियमावलीनुसार आम्ही संध्याकाळी 5 ते पहाटे 5 पर्यंत आझाद मैदानातू बाहेर पडणार आहोत. मात्र, पाहाटे 5 वाजता आम्ही पुन्हा एकदा आझाद मैदानावर दुखवटा पाळणार असल्याचं एसटी कर्मचाऱ्यांनी म्हटलंय. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याशी आमची चर्चा झाली. त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतल्याचं या कर्मचाऱ्यांनी सांगितलं. तसंच आमची बाहेर राहण्याची आणि खाण्याची सोय झाल्याचंही कर्मचारी म्हणाले. दुसरीकडे राज्यात विविध आगारात पाळला जाणारा दुखवटा सुरुच राहील, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

इतर बातम्या :

शौर्य स्मारकाला साजेसा विकास करणार, कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभाला ऊर्जामंत्र्यांचं अभिवादन

नवीन वर्षात शेअर बाजाराची काय राहील दिशा आणि दशा? चांगल्या परताव्यासाठी काय रणनीती आखणार?