Maharashtra Politcs : राज्यात भाजपची शक्ती वाढणार; राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसला मोठा धक्का
maharashtra politics : महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. वाशिम जिल्ह्यातील विरोधी पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर राज्यातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने भाजपने पुन्हा देशासहित राज्यातही मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. देशातील तरुणांचं मन वळवण्यासाठी भाजपने अनेक कार्यक्रम हाती घेतले आहेत. या राजकीय घडामोडींदरम्यान भाजपने मित्रपक्षासह विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होईल. या पक्ष प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे आणि ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या वाशिम जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती, जिल्हा परिषदेचे माजी सभापती, माजी सदस्य आणि इतर पदाधिकारी आमदार श्याम खोडे यांच्या नेतृत्वात मुंबई प्रदेश अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत दुपारी 1 वाजता भाजपात प्रवेश करणार आहेत.
पदाधिकाऱ्यांमध्ये सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग कोठाळे, काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते तथा वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती महादेव काकडे, उपसभापती गोवर्धन चव्हाण, शिंदेच्या शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सभापती विजय खानझोडे, ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन डोफेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वास गोदमले,भागवत येवले,भारत व्यवहारे, एन. डी राठोड आणि मंगरुळपीर बाजार समितीचे माजी सभापती भास्कर शेगीकर यांच्यासह पंचायत समितीचे माजी सभापती, सदस्य, काही सरपंच असे 100 पेक्षा जास्त कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
कल्याण-डोंबिवलीत शिंदेंच्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
कल्याण-डोंबिवलीत भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत वाद तीव्र होत आहे. काही दिवसांपूर्वी काही भाजप पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता शिंदे गटातील काही पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कल्याणमधील या पक्षप्रवेशामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. भाजपमध्ये प्रवेश करताच अर्चित खडकूल यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केले. त्यांनी शिवसेनेत योग्य वेळी पद देण्यात आले नाही, असा आरोप केला आहे.