BREAKING | ठाण्यातून मोठी बातमी, शिवसेना आणि ठाकरे गट आमनेसामने, मोठा गदारोळ

राज्यभरात सध्या होळीचा उत्साह असताना ठाण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ठाण्यात शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात राडा झाल्याची माहिती मिळत आहे.

BREAKING | ठाण्यातून मोठी बातमी, शिवसेना आणि ठाकरे गट आमनेसामने, मोठा गदारोळ
| Edited By: Chetan Patil | Updated on: Mar 06, 2023 | 9:33 PM

ठाणे : राज्यभरात सध्या होळीचा उत्साह असताना ठाण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ठाण्यात शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात राडा झाल्याची माहिती मिळत आहे. ठाण्यातील शिवाई नगर या परिसरात शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यावरून ठाकरे गट आणि शिवसेनेचे (Shiv Sena) कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. हा वाद आता विकोपाला पोहोचला आहे. वातावरण चिघळताना दिसतंय. दोन्ही बाजूने शिवीगाळ देखील केली जात असल्याची माहिती मिळत आहे. संबंधित प्रकाराची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. शाखा परिसरात पोलिसांचा प्रचंड मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाची पायमल्ली करून मिंधे गटाकडून आज शिवाई नगर येथील जुन्या शिवसेना शाखेचा कब्जा घेण्याचा डाव होत आहे, अशी भूमिका खासदार राजन विचारे यांनी मांडली आहे. दरम्यान, पोलीस दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

शिवसेनेचे नेते आणि ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी घटनास्थळावरुन ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “स्थानिक पदाधिकारी म्हणजे कोण? आम्ही सगळे इथलेच आहोत. आतमध्ये सगळे स्थानिक पदाधिकारीच आहेत. बाहेरुन कोणीतरी येणार, मी जिल्हा प्रमुख म्हणून आलेलो आहे. या ठिकाणचे नगरसेवक स्थानिक आहेत. इथे बसणारी लोकं आमच्या कार्यकर्त्यांसोबत बसायचे. पण ते या ठिकाणी हक्क सांगायला लागले तर स्थानिक पदाधिकारी कसं ऐकणार? ही शाखा सरनाईक यांनी बांधलेली आहे”, असा दावा नरेश म्हस्के यांनी केला.

‘आमची जागा, त्यांना बसायला का देऊ?’

“आनंद दिघे यांच्यानंतर ठाण्याचा पूर्ण डोलारा हा एकनाथ शिंदे यांनी सांभाळलेला आहे. ही शाखा सरनाईकांच्या मतदारसंघात आहे. त्यामुळे यांचा अधिकार काय आहे? त्यांना काम करायचं आहे तर त्यांनी बाजूला एखादं कार्यालय भाड्याने घ्यावं. आम्ही त्यांना मदत करु. शेवटी समाजपयोगी कार्याला मदत करणं गरजेचं आहे. पण आमची संपत्ती आहे. आमची जागा आहे. शिवसेना म्हणून मान्यता आहे. यांना आम्ही का म्हणून बसायला देऊ?”, असा सवाल त्यांनी केला.

“शिवसेना आम्हाला अधिकृत दिलेलं आहे. त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव दिलं आहे. आम्हाला धनुष्यबाण मिळालं आहे. या शाखेवर धनुष्यबाण आहे. त्यांना मशाल निशाणी मिळाली आहे. त्यामुळे यांचा अधिकार काय असू शकतो? ही शाखा स्थानिकांच्या ताब्यात आहे. टाळा तोडलेलं नाही. त्यांच्याबरोबर कोणते स्थानिक आहेत? ते खोटं बोलत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकांनी शिवसेनेच्या विचारांनाच टाळं लावलं आहे”, असा टोला त्यांनी लगावला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us