कल्याण डोंबिवलीकरांसाठी खुशखबर, मालमत्ता करात सवलत मिळणार

तुम्ही कल्याण-डोंबिवली शहरात वास्तव्यास असाल तर आपल्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांनी महत्त्वाच्या योजनेची घोषणा केली आहे. ही योजना मालमत्ता कराबाबत दिलासा देणारी आहे. केडीएमसीचे माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनीदेखील याबाबत माहिती दिली आहे.

कल्याण डोंबिवलीकरांसाठी खुशखबर, मालमत्ता करात सवलत मिळणार
Chetan Patil | Updated on: May 19, 2023 | 10:11 PM

कल्याण : कल्याण डोंबिवलीतील अनेक नागरिकांनी गेल्या काही वर्षांपासून कल्याण डोंबिवली महापालिकेकडे मालमत्ता कर भरलेला नाही. त्यामागे अनेक कारणं आहेत. गेल्या तीन वर्षांपासून राज्यात कोरोनाचं संकट होतं. त्यामुळे अनेकांना आर्थिक संकटांना सामोरं जावं लागलं. याशिवाय अनेकांना कोरोनाची लागण झाली. मुंबईपासून जवळची शहरं असल्याने या शहरांना सर्वाधिक बाधा झाली. त्यामुळे या काही वर्षांमध्ये अनेकांची टॅक्सची थकबाकी राहिली आहे. महापालिकेकडून कराच्या थकबाकीवर व्याजही आकारलं जात आहे. त्यामुळे थकबाकीचा आकडा आणखी फुगला आहे. पण केडीएमसीचे माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांनी याबाबत मोठी आणि महत्त्वाची बातमी दिली आहे.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात 27 गावांसंदर्भात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी केडीएमसी महापालिका हद्दीतील नागरिकांना टॅक्समध्ये दिलासा देण्यासाठी योजना घोषित करण्याचे आदेश दिले होते. त्याच अनुषंगाने केडीएमसीचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी आज अभय योजनेची घोषणा केली आहे”, असं दीपेश म्हात्रे यांनी सांगितलं.

‘थकबाकी व्याज माफ केलं जाणार’

“ही योजना 15 जून ते 31 जुलैपर्यंत असणार आहे. या योजनेअंतर्गत लोकांना टॅक्समध्ये मोठा दिलासा मिळेल. लोकांचा थकबाकी व्याज माफ केलं जाईल. या योजनेचा फायदा सर्व नागरिकांना फायदा होणार आहे. या निर्णयानिमित्ताने मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि केडीएमसीच्या आयुक्तांचा आभार मानतो”, अशी प्रतिक्रिया दीपेश म्हात्रे यांनी दिली.

दीपेश म्हात्रे यांचं आयुक्तांना पत्र

दरम्यान, दीपेश म्हात्रे यांनी याबाबत केडीएमसी आयुक्तांना पत्रव्यवहार करुन कर आकारणीत दिलासा मिळावा, अशी विंनती केली होती. “मागील काही काळात कोरोना संकटासारखी भयावह परिस्थिती आलेली होती. त्यावेली महापालिका क्षेत्रातील अनेक नागरिकांची नोकरी गेल्यामुळे, कामधंदे बंद झाल्यामुळे, निर्माण झालेलया आर्थिक अडचणींमुळे मागील काही वर्षांपासून अनेक नागरिकांचा मालमत्ता कर थकीत आहे. तो कर न भरल्यामुळे महापालिकेकडून या करावर शिक्षा म्हणून अधिकचा कर आकारण्यात येत आहे”, असं दीपेश म्हात्रे पत्रात म्हणाले होते.

“सदरची रक्कम नागरिकांनी एकरकमी भरण्यास अनेक अडचणी येत आहेत. तरी आपण याय सर्व बाबींचा सखोल विचार करुन महापालिका क्षेत्रात उभययोजना राबवून नागरिकांना दिलासा मिळवून द्यावा, अशी आपणास विनंती”, असं दीपेश म्हात्रे पत्रात म्हणाले होते.

दीपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळालं आहे. तसेच नागरिकांना देखील आयुक्तांनी जाहीर केलेल्या या योजनेमुळे दिलासा मिळणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us