पोलिसांकडून जितेंद्र आव्हाडांना अटक, वर्तक नगर पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्ते आक्रमक, घडामोडींना वेग

| Updated on: Nov 11, 2022 | 4:50 PM

कार्यकर्त्यांकडून जितेंद्र आव्हाडांच्या अटकेवर निषेध व्यक्त केला जातोय.

पोलिसांकडून जितेंद्र आव्हाडांना अटक, वर्तक नगर पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्ते आक्रमक, घडामोडींना वेग
Follow us on

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये घुसून ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो रद्द केला होता. यावेळी एका प्रेक्षकाला कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्यात आल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं होतं. पण जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी संबंधित प्रेक्षकाला मारहाण केली होती का ते अधिकृतपणे स्पष्ट झालं नव्हतं. या प्रकरणी शंभर जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांचादेखील समावेश आहे. जितेंद्र आव्हाड यांना या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. पण त्यांच्या अटकेनंतर वर्तक नगर पोलीस ठाण्याबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले.

जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: ट्विट करुन आपल्याला अटक करण्यात आल्याची माहिती दिली होती. त्यानंतर ठाण्याच्या वर्तक नगर पोलीस ठाण्याबाहेर शेकडो कार्यकर्ते जमा झाले. या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात येत होती. जितेंद्र आव्हाड यांनीदेखील आपल्यावर चुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्रतिक्रिया दिलीय. आपण गुन्हा कबूल करणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडलीय.

वर्तक नगर पोलीस ठाण्याबाहेर महिला कार्यकर्त्यांकडूनही घोषणाबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांची संख्या हळूहळू वाढली. या कार्यकर्त्यांकडून जितेंद्र आव्हाडांच्या अटकेवर निषेध व्यक्त केला जातोय.

हे सुद्धा वाचा

कार्यकर्त्यांचा रोष पाहता वर्तक नगर पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा फौजफाटा परिसरात वाढवण्यात आलाय.

“हे सूडबुद्धीचं राजकारण आहे. कारण खरा इतिहास हे आव्हाडांना माहितीय तेवढा कुणाला माहिती नाही. त्यांनी कुणालाही मारलेलं नाही. यामध्ये राजकारण आहे. राजकारण करुन आव्हाडांना अटकवण्याचा प्रयत्न करत आहेत”, अशी प्रतिक्रिया एका आंदोलक महिलेने दिली.

या सगळ्या घडामोडींदरम्यान जितेंद्र आव्हाड यांची सुटका कधी होणार? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. जितेंद्र आव्हाड यांना आज ठाणे कोर्टात दाखल करण्यात आलंय. तिथे पोलीस नेमकी काय भूमिका मांडतात आणि प्रकरण कुठपर्यंत जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्य सरकारवर टीका केली जात असताना राज्याचे उद्योगमंत्री यांनी प्रकरणावर प्रतिक्रिया दिलीय. जितेंद्र आव्हाड यांना अटक ही कायदेशीर आहे. कोणी मारहाण केली हे सर्वांनी पाहिलंय, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.