केंद्र-राज्यात लसीकरणाचा वाद नाही; त्र्यंबकेश्वर येथे देवेंद्र फडणवीस यांचा दावा

| Updated on: Nov 05, 2021 | 2:25 PM

केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये लसीकरणाचा कसलाही वाद नाही, असा दावा शुक्रवारी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

केंद्र-राज्यात लसीकरणाचा वाद नाही; त्र्यंबकेश्वर येथे देवेंद्र फडणवीस यांचा दावा
देवेंद्र फडणवीस.
Follow us on

नाशिकः केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये लसीकरणाचा कसलाही वाद नाही, असा दावा शुक्रवारी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते त्र्यंबकेश्वरमध्ये आले असता बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाडव्याच्या मुहूर्तावर श्रीक्षेत्र केदारनाथ येथे आद्य शंकराचार्याच्या समाधी आणि मूर्तीचे अनावरण केले. सोबतच देशभरातील तीर्थक्षेत्रांवर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्र्यंबकेश्वर येथे आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये धार्मिक कार्यक्रम झाला. यावेळी फडणवीस म्हणाले की, त्र्यंबकेश्वर येथे आल्याने प्रसन्नतेची भावना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनर्निर्माण करण्याचा निश्चय केला होता. या सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे म्हणून मी ही येथे सहभागी झालो. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या हर घर दस्तक या लसीकरण अभियानावर मत व्यक्त केले. राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये लसीकरणाचा कसलाही वाद नसल्याचे सांगायला ते विसरले नाहीत. लसीकरणाला गती मिळावी म्हणून राज्य सरकारने कवच कुंडल मोहीम सुरू केली. मात्र, हुबेहुब अशाच मोहिमेचा शुभारंभ आज केंद्र सरकारच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील पेगलवाडी येथून करण्यात येत आहे. त्यामुळे या मोहिमा एकमेकांविरुद्ध उभ्या टाकल्याचे चित्र राज्यात तरी निर्माण झाले आहे. यातली नेमकी कोणती लसीकरण मोहीम राबवायची, असा पेच आरोग्य कर्मचाऱ्यांना पडला आहे. यावर फडणवीस यांनी यावेळी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. सोबतच इंधनाचे दर आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. आता अबकारी कर कमी झाला आहे. राज्य सरकारने देखील कर कमी करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा. राज्य सरकारने ठरवले तर अजूनही दर कमी करता येतील, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

केदारनाथ सोहळ्याचे दर्शन

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर प्रांगणात केदारनाथ येथील सोहळ्याचे दर्शन घडले. यावेळी फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची उपस्थिती होती. त्यामुळे या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. त्र्यंबक मंदिराच्या आवारात भव्यदिव्य मंडप टाकला होता. या परिसरातच नेत्यांची वाहने लागल्याने काही वेळ वाहतूक कोंडी देखील झाल्याची दिसली. (There is no dispute over vaccination at the Center-State; Devendra Fadnavis claims at Trimbakeshwar)

इतर बातम्याः

‘कवच कुंडल’ विरुद्ध ‘हर घर दस्तक’; कोणती लसीकरण मोहीम राबवायची, राज्यातले आरोग्य कर्मचारी पेचात!

NashikGold: पाडव्यादिवशी महागाईचा गोडवा; सोन्या-चांदीच्या किमती वाढल्या!