Explainer : 40 दश लक्ष लोक आजही गुलामगिरीचे बळी, समूळ निर्मुलनासाठी काय आहेत उपाययोजना

गुलामगिरीच्या विविध प्रकारात दरवर्षी लाखो जीव गमावले जातात. मुले त्यांचे बालपण गमावतात. तर, स्त्रिया आपले मातृत्व हरवून बसतात. स्थलांतरित कामगार यांचे शोषण केले जाते. बंधनकारक मजुरी, कर्ज गुलामगिरी यासारख्या प्रथा फोफावल्या.

Explainer : 40 दश लक्ष लोक आजही गुलामगिरीचे बळी, समूळ निर्मुलनासाठी काय आहेत उपाययोजना
International Day Of Abolition For Slavery
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar | Updated on: Dec 02, 2023 | 7:55 PM

मुंबई : 2 डिसेंबर 2023 | जगाचा एकूण इतिहास पहिला तर केवळ मुठभर लोकांनी आपल्या साधन, संपत्ती आणि शस्त्रे यांच्या जोरावर जगावर सत्ता केली. जे त्याच्या अधीन झाले त्यांना त्यांनी गुलामाची वागणूक दिली. हीच गुलामगिरी पुढे वेगवेगळ्या प्रकारे विकसित झाली. अनेक वर्ष झाली. देश, राष्ट्रे प्रगत झाली तरी अजूनही गुलामगिरीचे काही पारंपारिक रूप त्यांच्या मूळ स्वरुपात टिकून आहेत. तर, काही नव्याने रूपांतरित झाले. काही अजूनही पारंपारिक श्रद्धा आणि रीतिरिवाजांमध्ये गढून गेले आहेत. म्हणूनच समाजातील काही असुरक्षित गट अजूनही गुलामगिरीच्या जोखडात वावरत आहेत. जसे, खालच्या जाती, आदिवासी, अल्पसंख्याक, महिला, बालके आणि स्थानिक लोकांविरुद्ध दीर्घकाळ चालत आलेला संघर्ष.

2 डिसेंबर हा गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून पाळला जातो. मानवाधिकारांच्या विरोधात काम करणाऱ्या आधुनिक गुलामगिरीची लोकांना जाणीव करून देण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. जगातील 40 दश लक्षाहून अधिक लोक या आधुनिक गुलामगिरीचे बळी आहेत. धमक्या, हिंसा, बळजबरी किंवा सत्तेचा गैरवापर यामुळे ती व्यक्ती गुलामगिरी नाकारू शकत नाही. हा दिवस शोषणाच्या याच परिस्थितीची आठवण करून देतो.

या दिवसाचे महत्व काय?

व्यक्तींची तस्करी, लैंगिक शोषण, बालमजुरी, सक्तीचे विवाह, बाल विवाह, वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करणे, सशस्त्र संघर्षात वापरण्यासाठी मुलांची सक्तीने भरती यासारख्या गुलामगिरीचे उच्चाटन करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाची महासभा झाली. गुलामगिरीच्या प्रकारांबद्दल जागरुकता यावी, ती नाहीशी व्हावी यासाठी लोक एकत्र कसे येऊ शकतात याबद्दल महासभेत विचार विनिमय झाला. महासभेने महत्वाचा ठराव ( 317 (IV) 1949) केला. यानुसार 2 डिसेंबर हा दिवस गुलामगिरी निर्मूलन दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

गुलामगिरीच्या विविध प्रकारात दरवर्षी लाखो जीव गमावले जातात. मुले त्यांचे बालपण गमावतात. तर, स्त्रिया आपले मातृत्व हरवून बसतात. स्थलांतरित कामगार यांचे शोषण केले जाते. बंधनकारक मजुरी, कर्ज गुलामगिरी यासारख्या प्रथा फोफावल्या. त्यामुळे या प्रथा नष्ट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

2023 ची थीम ‘परिवर्तनात्मक शिक्षणाद्वारे गुलामगिरीचा वंशवादाचा वारसा लढा’

गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी यंदा 2023 या वर्षाची थीम आहे ‘परिवर्तनात्मक शिक्षणाद्वारे गुलामगिरीचा वंशवादाचा वारसा लढा’. यामध्ये मानवी तस्करी, लैंगिक शोषण, बालमजुरी, सक्तीचे विवाह, मुलांवर दबाव आणणे आणि शस्त्रांच्या शर्यतीत भरती करणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. हे सर्व प्रकार आधुनिक युगातील गुलामगिरीचे प्रतीक आहेत.

आज जागतिक स्तरावर दहापैकी एक मुले काम करताहेत. त्यांचे मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि शेक्षणिक शोषण होत आहे. हे बालहक्कांविरुद्ध आहे. असे काम करण्यापासून संरक्षण मिळण्याचा बालकांचा हक्क आहे. मात्र, तो हिरावून घेतला जात आहे. त्यामुळे त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्याचा हा दिवस. यासोबतच व्यक्तींची तस्करी रोखण्यासाठीचा आजचा दिवस. विशेषत: स्त्रिया आणि मुलांची तस्करी, धमकी, बळाचा वापर करून त्यांचे शोषण केले जाते. लैंगिक शोषण, सक्तीचे श्रम, सेवा, अवयव काढून टाकणे हे गुन्हे आहेत. याचे समूळ निर्मुलन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन स्वीकारण्यात आला.

संयुक्त राष्ट्रांच्या मते अंदाजे ४०.३ दशलक्ष लोक आधुनिक गुलामगिरीचे बळी आहेत. यामध्ये २४.९ दशलक्ष मजूर आणि १५.४ दशलक्ष सक्तीचे विवाह यांचा समावेश आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक ४ पैकी १ मूल हे आधुनिक गुलामगिरीला बळी पडले आहे. यासाठी महिला वर्ग आणि बालकांना सामान्य जीवन देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करून ते थांबविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

Follow Us