3 बायका, असंख्य गर्लफ्रेंड अन् लक्झरी… करोडपती शिपायाचा नाद खुळा; लाईफस्टाईल वाचून थक्कच व्हाल!
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका शिपायाने लग्झरी आयुष्य जगण्यासाठी जे काही कृत्य केले ते पाहून सर्वजण चकीत झाले. आता नेमकं काय घडलं जाणून घ्या...

असे म्हटले जाते की, प्रेम माणसाकडून अशा गोष्टी करून घेते ज्याचा त्याने कधी विचारही केलेला नसतो. पण पिलीभीतच्या एका साध्या शिपायाने प्रेमाच्या नादात चक्क सरकारी तिजोरीवरच डल्ला मारला. तीन पत्नी, अनेक प्रेयसी, महागडे फ्लॅट्स, जमिनी आणि लक्झरी लाइफस्टाइल हे सर्व त्याने सरकारी पैशातून थाटले होते. शिक्षण विभागाच्या DIOS कार्यालयात तैनात असलेला शिपाई इल्हाम उर रहमान शम्सी याने सुमारे ८ कोटी रुपयांची अवाढव्य फसवणुक केली आहे.
साधा शिपाई पण थाट राजासारखा
इल्हाम हा चतुर्थ श्रेणी कर्मचारी होता, पण त्याचे राहणीमान एखाद्या मोठ्या श्रीमंतापेक्षा कमी नव्हते. ‘जनता टेक्निकल इंटर कॉलेज’मध्ये लिपिक पदावर असताना त्याने DIOS कार्यालयात चांगलीच पकड निर्माण केली होती. ट्रेझरी ऑफिसमधील तांत्रिक बाबींची खडान् खडा माहिती असलेल्या इल्हामने बनावट ‘बेनेफिशियरी आयडी’ तयार केले आणि सरकारी निधी स्वतःच्या आणि आपल्या जवळच्या लोकांच्या खात्यात वळवण्यास सुरुवात केली. तपासात समोर आले की, त्याने 53 वेगवेगळ्या संशयास्पद खात्यांमध्ये 98 व्यवहारांद्वारे 8 कोटी रुपयांहून अधिकचा अपहार केला.
एकट्या त्याच्या ‘अर्शी खातून’ नावाच्या पत्नीच्या खात्यात १ कोटी १ लाख रुपयांहून अधिक रक्कम पाठवण्यात आली होती. उर्वरित पैसे त्याच्या इतर पत्नी आणि प्रेयसींचे महागडे छंद पूर्ण करण्यासाठी वापरले गेले. त्याने फ्लॅट्स आणि जमिनी खरेदी करून अयाशीचे साम्राज्य उभे केले होते.
सात महिलांना अटक
सप्टेंबर २०२४ पासून सुरू असलेल्या या मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. मुख्य आरोपी इल्हाम शम्सीच्या सात महिला साथीदारांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये लुबना, फातिमा, परवीन खातून, आशकारा परवीन, अजारा खान, नाहिद आणि आफिया खान यांचा समावेश आहे. इल्हामची पत्नी अर्शी खातून आधीच तुरुंगात आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रम दहिया यांच्या माहितीनुसार, पोलिसांनी या खात्यांमधील ५ कोटी ५० लाख ५४ हजार ५९४ रुपये गोठवले (फ्रीज) आहेत.
इल्हाम शम्सीची ही कहाणी आता एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखी वाटत आहे. एक साधा शिपाई इतक्या मोठ्या घोटाळ्याचा मास्टरमाइंड कसा बनला, हा आता तपासाचा विषय आहे. मात्र, प्रेमाच्या नावाखाली त्याने सरकारी तिजोरीची मोठी लूट केली हे स्पष्ट झाले आहे. सरकारी पैशाची एक-एक पाई वसूल केली जाईल आणि या प्रकरणातील कोणालाही सोडले जाणार नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे.