जामीन मंजूर होताच, संजय राऊत आता भारत जोडो यात्रेत जाणार…
खासदार संजय राऊत यांना जामीन मिळताच ते आता काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.
नवी दिल्लीः शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तब्बल शंभर दिवसानंतर जामीन मिळाला. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. खासदार पत्रावाला चाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांनी न्यायालयीन कोठडी मिळाली होती, त्यामुळे ते गेल्या शंभर दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत होते. तर त्यानंतर आज त्यांना जामीन मिळाल्यानंतर राज्यातील विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे स्वागत आणि आनंद व्यक्त केला गेला आहे.
संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर एकीकडे आनंद व्यक्त केला जात आहे तर दुसरीकडे खासदार संजय राऊत काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
काँग्रेसची भारत जोडो यात्रा कन्याकुमारीपासून सुरु होऊन कर्नाटक, तेलंगणा या राज्यातून आता महाराष्ट्रात आली आहे. भारत जोडो यात्रा आता देगुलरपासून पुढे चालू आहे.
त्यामुळे भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येत असल्याने खासदार संजय राऊत यांना जामीन मिळताच ते राहुल गांधींच्या यात्रेत सहभागी होणार असल्याचे पक्के झाले आहे. त्यामुळे त्यांच्या या भारत जोडो यात्रेतील सहभागाकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.
उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत, आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेही काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याने त्याची उत्सुकता शिवसेनेच्या नेत्यांसह विरोधकांनाही लागून राहिली आहे.