महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता, नितीश कुमारांनी जेडीयूच्या सर्व खासदार आमदारांची बैठक

| Updated on: Aug 07, 2022 | 4:55 PM

जेडीयूचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी आपल्या सर्व आमदार आणि खासदाराची बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठक बिहारची राजधानी पाटना इथं होणार आहे. या बैठकीत जेडीयू मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जातेय.

महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता, नितीश कुमारांनी जेडीयूच्या सर्व खासदार आमदारांची बैठक
नितीश कुमार, मुख्यमंत्री, बिहार
Image Credit source: Google
Follow us on

नवी दिल्ली : महाराष्ट्रात मोठ्या राजकीय भूकंपानंतर आता बिहारमध्येही मोठी राजकीय (Bihar Politics) उलथापालथ होण्याची चिन्ह दिसत आहेत. भाजप आणि जनता दल युनायटेडमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत कलहामुळे बिहार सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. आज जेडीयूचे सर्वेसर्वा नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आपल्या सर्व आमदार आणि खासदाराची बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठक बिहारची राजधानी पाटना इथं होणार आहे. या बैठकीत जेडीयू मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जातेय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजदच्या तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी आपल्या सर्व आमदारांना 10 ते 12 ऑगस्टदरम्यान पाटन्यातच राहण्यास सांगितलं आहे.

बिहारमध्ये गेल्या काही दिवसांत राजकीय उलथापालथीची शक्यता व्यक्त केली जात आहे. नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपची साथ सोडून राजदला सोबत घेऊन सत्ता स्थापन करतील, अशीही चर्चा सध्या बिहारच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यातच मुख्यमंत्री नितीश कुमारच असतील, मात्र यावेळी उपमुख्यमंत्री कुणी नसेल. पण सरकार राजदच्या पाठिंब्यानं चालेल. या शक्यतांना किती अर्थ आहे हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल. मात्र, आगामी काही दिवस बिहारच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाचे मानले जात आहेत.

भाजपच्या बैठकांकडे नितीश कुमारांची पाठ

गेल्या काही दिवसांत भाजपच्या दोन वरिष्ठ नेत्यांनी बिहारमध्ये बैठक घेतली, रोड शो केला. इतकंच नाही तर 2024 आणि 2025 नंतरही जेडीयूसोबत युती असले असं जाहीर केलं. मात्र, नितीश कुमार भाजप नेत्यांच्या बैठका, माजी राष्ट्रपतींनी दिलेलं भोजन, राष्ट्रपतींचा शपथविधी, निती आयोगाची बैठक अशा महत्वाच्या क्षणी अनुपस्थित राहून, बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचंच सांगत आहेत.

निती आयोगाच्या बैठकीपासूनही नितीश कुमार दूरच

आज राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली निती आयोगाची बैठक होत आहे. या बैठकीला नितीश कुमार उपस्थित राहिले नाहीत. नितीश कुमारांची अनुपस्थितीमुळे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. बिहारमधील भाजप आणि जेडीयू सरकारमध्ये आलबेल नाही? भाजप आणि जेडीयूमधील तणाव इतका वाढला की नीतीश कुमार पंतप्रधान मोदींच्या बैठकीकडेही पाठ फिरवत आहेत? असा प्रश्न आता बिहारच्या राजकीय वर्तुळात विचारले जात आहेत.

नीतीश कुमार कोरोनातून नुकतेच बरे

नितीश कुमार दुसऱ्यांना पंतप्रधान मोदींच्या बैठकीला अनुपस्थित आहेत. मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच नितीश कुमार कोरोनातून बरे झाले. त्यामुळे त्यांना अजूनही थकवा जाणवतोय. त्यामुळे ते प्रवास करत नाहीत. तसंच बिहारमध्ये अडकून राहिलेली कामं मार्गी लावण्याकडे त्यांचा कल आहे. निती आयोगाच्या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी सहभागी व्हावं, अशी नितीश कुमारांची अपेक्षा होती. मात्र बैठकीला केवळ मुख्यमंत्रीच हजर राहणार असल्याने बिहारमधून कुणीही या बैठकीला उपस्थित नाही.