आंध्रप्रदेशमध्ये कोरोनाच्या आयुर्वेदिक औषधासाठी अनेक राज्यांमधून तुफान गर्दी, ICMR तपासणी करणार

| Updated on: May 23, 2021 | 7:31 PM

आंध्र प्रदेशातल्या नेल्लूरमध्ये कोरोना लसीला जशा रांगा लागतात तशा रांगा कोरोनाच्या एका कथित आयुर्वेदिक औषधासाठी लागल्यात.

आंध्रप्रदेशमध्ये कोरोनाच्या आयुर्वेदिक औषधासाठी अनेक राज्यांमधून तुफान गर्दी, ICMR तपासणी करणार
Follow us on

हैदराबाद : एकीकडे देशभरात डॉक्टर्स, नर्सेस तासंतास रुग्णांची सेव करत त्यांना कोरोनाच्या मगरमिठीतून बाहेर काढत आहेत. दुसरीकडे वैज्ञानिकांनी जवळपास वर्ष-दीडवर्ष संशोधन करुन कोरोना लसही शोधलीय. या कोरोना लसीकरणातूनही नागरिकांना सुरक्षित केलं जातंय. मात्र, दुसरीकडे कोणतेही शास्त्रीय पुरावे न देता कोरोना बरा करण्याचे अजब दावे होत आहेत. इतकंच नाहीतर लोकंही या दाव्यांना बळी पडत त्याच्या मागे धावताना दिसत आहेत. असाच एक प्रकार आंध्र प्रदेशातल्या नेल्लूरमध्ये समोर आलाय. येथे कोरोना लसीला जशा रांगा लागतात तशा रांगा कोरोनाच्या एका कथित आयुर्वेदिक औषधासाठी लागल्यात (Claims of Arurvedic Corona medicine in Andhra Pradesh ICMR going to investigate).

औषधाचे फक्त 2 थेंब डोळ्यात टाकून ऑक्सिजन पातळी वाढवण्याचा दावा

औषधाचे फक्त 2 थेंब डोळ्यात टाका आणि ऑक्सिजन पातळी सुधारा, असा प्रचार या औषधाचा केला जातोय. याशिवाय गुळवेल, कडूनिंब, काळीमिरी, आलं आणि हळद यांच्या मिश्रणातून तयार होणाऱ्या गोळ्याही इथं दिल्या जातायत. यालाच कोरोनाचं रामबाण औषध म्हणत नेल्लोर जिल्ह्यातल्या कृष्णपटणम या छोट्याशा गावात मोठ्या प्रमाणात मोफत वाटप सुरु आहे.

याबाबत लोकांनी सोशल मीडियातून माहिती दिल्यानंतर काही काळातच ही माहिती वाऱ्यासारखी पसरली. तेव्हापासून आतापर्यंत या गावात हजारो लोक दाखल झालेत. काही तर थेट अॅम्ब्युलन्समधून रुग्णांनाच घेऊन येतायत. मात्र, कोरोनाचं औषध घेण्यासाठी जमलेली गर्दीच कोरोनाच्या विस्फोटाला आमंत्रण ठरतेय.

हे औषध खरंच कोरोनावर गुणकारी आहे का?

आनंदय्या नावाच्या एका वैद्यानं हे औषध तयार केलंय. त्याचं मोफत वाटपही केलं जातंय. ज्यासाठी काही अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि आमदार-खासदारही इथं येतायत. मात्र, खरोखर हे औषध कोरोनावर गुणकारी आहे का? याचं शास्रीय उत्तर अजून मिळालेलं नाही.

स्थानिकांकडन अजब आणि अवैज्ञानिक दावे

या औषधाचा परिणाम वैज्ञानिक निकषांवर तपासलेला नसतानाही स्थानिक लोकप्रतिनिधींनी या औषधाबाबत केलेले दावे चमत्कारिक आहेत. त्यांच्या मते, “रुग्ण कितीही गंभीर असला, तरी दोन दिवसात त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह होतोय. सीटी स्कोर 24 असला, तरी काही दिवसात तो शून्यावर येतोय.” आतापर्यंत हे आयुर्वेदिक औषध घेतलेल्या एकाही रुग्णानं कोणतीच तक्रार केलेली नाही. त्याउलट प्रकृतीत सुधारणा झाल्याचा दावा लोक करतायत. म्हणून आंध्र प्रदेशच्या सरकारनं सुद्धा या औषधाबाबत उच्चस्तरित समिती स्थापन करुन आयसीएमआरला यावर संशोधन करण्याचं आवाहन केलंय. खुद्द उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही औषधाचा
अभ्यास करण्याचा सल्ला दिलाय.

सध्या औषधामुळे होणाऱ्या गर्दीनंतर औषधाचं वितरण थांबवण्यात आलंय. औषधाचा परिणाम काहीही निघो, पण त्यामुळे होणारी गर्दी ही रोगापेक्षा इलाज भयंकर करण्याची परिस्थिती ओढावली होती. तूर्तास या औषधाच्या संशोधनाअंती हाती काय येतं, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

संबंधित व्हिडीओ पाहा :

हेही वाचा :

कोरोना औषधांवरील जीएसटी हटवल्यास रुग्णांना आर्थिक फटका बसणार; औषधे महाग होणार

PHOTOS : वर्ध्यात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उत्पादनाला सुरुवात, नितीन गडकरींकडून पाहणी

रेमडेसिवीर रामबाण उपाय नाही, देशातील 3 मोठ्या डॉक्टरांकडून कोरोनावर मात करण्याचा ‘हा’ उपाय

Claims of Ayurvedic Corona medicine in Andhra Pradesh ICMR going to investigate