लसीकरणासाठी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पाहून गावकऱ्यांच्या थेट नदीत उड्या! हे कुठे घडलं?

| Updated on: May 24, 2021 | 4:15 PM

आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम गावात दाखल झालेली पाहताच काही गावकऱ्यांनी लसीकरणापासून वाचण्यासाठी थेट नदीत उड्या टाकल्या!

लसीकरणासाठी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पाहून गावकऱ्यांच्या थेट नदीत उड्या! हे कुठे घडलं?
आरोग्य कर्मचाऱ्यांना पाहून ग्रमस्थांच्या शरयू नदीत उड्या
Follow us on

लखनऊ: देशात कोरोना विषाणूने थौमान घातलं असताना त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडून कोरोना लसीकरणावर भर दिला जात आहे. मात्र, काही भागात लोक लसीकरणापासून पळ काढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोरोना विषाणूप्रमाणेच लोकांच्या मनात लसीकरणाबाबतही एक भीती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. असंच एक उदाहरण उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील एका गावात दिसून आलं. आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम गावात दाखल झालेली पाहताच काही गावकऱ्यांनी लसीकरणापासून वाचण्यासाठी थेट नदीत उड्या टाकल्या! (Jump into the Sharayu River to escape the corona vaccination)

बाराबंकी जिल्ह्यातील सिसौडा हे साधारण पंधराशे वस्तीचं गाव आहे. या गावात आतापर्यंत फक्त 18 जणांनी लस घेतल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं. गावातील नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत एक भीती निर्माण झाली आहे. अफवा आणि उलटसुलट चर्चांना बळी पडलेले हे नागरिक कोरोना लस घेणे टाळत आहेत. विषाची सुई कशाला टोचायची? असे अनेक गैरसमज इथल्या लोकांच्या मनात आहेत. या गैरसमजातून सिसौडाचे ग्रामस्थ आरोग्य कर्मचाऱ्यांपासून आणि लसीकरणापासून चार हात लांबच राहणे पसंत करत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

सिसौडा गावात लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचं पथक येऊन दाखल झालं. त्यांनी प्राथमिक शाळेत कॅम्प लावला. मात्र, दुपारी 1 वाजेपर्यंत फक्त 3 लोकांनीच कोरोना लस घेतली. त्यामुळे गावकऱ्यांची समजूत काढण्यासाठी आशा महिला, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचारी गावात गेले. त्यांना पाहून सिसौडाचे ग्रामस्थ घाबरले. आपण जर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तावडीत सापडलो तर आपल्याला लस घ्यावी लागेल, अशी भीती इथल्या ग्रामस्थांना वाटली. या भीतीपोटी त्यांनी थेट शरयू नदीमध्ये उड्या घेण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून आरोग्य विभागाचे कर्मचारीही घाबरले. त्यांनी नागरिकांना नदीबाहेर येण्याची विनंती केली. मात्र, गावकरी काही त्यांचं ऐकेनात. तेव्हा घाबरलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना याची कल्पना दिली.

शरयू नदीत उड्या टाकलेल्या ग्रामस्थांची उपजिल्हाधिकाऱ्यांनी समजूत काढली

 

उपजिल्हाधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांची समजूत

रामनगरचे उपजिल्हाधिकारी राजीव शुक्ला सिसौडा गावात पोहोचले. त्यांनी शरयू नदीमध्ये उड्या घेतलेल्या ग्रामस्थांची समजूत काढली. त्यांना नदीबाहेर येण्याची विनंती केली. अखेर उपजिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन ग्रामस्थ नदीबाहेर आले. त्यानंतर राजीव शुक्ला यांनी गावकऱ्यांना लसीकरणाचं महत्व समजावून सांगितलं. लसीकरणामुळेच कोरोनापासून आपला जीव वाचू शकतो. देशात कोट्यवधी लोकांनी आतापर्यंत करोनाची लस घेतली आहे. त्यामुळे तुम्ही न घाबरता लस घ्या, अशी विनंती शुक्ला यांनी सिसौडाच्या लोकांना केली. तरीही त्या दिवसात सिसौडातील फक्त 18 जणांनीच कोरोना लस टोचून घेतली.

संबंधित बातम्या :

‘मोदीजी आमच्या मुलांची लस विदेशात का पाठवली?’, काँग्रेसचं मुंबईत आंदोलन, भाई जगतापांची घोषणा

Maharashtra Lockdown: राज्यात 4 टप्प्यात अनलॉकिंग; काय आहे ठाकरे सरकारचा प्लॅन?

Jump into the Sharayu River to escape the corona vaccination