Corona : पुन्हा मास्क घालण्याची वेळ आलीये का? पाहा काय म्हणताय आरोग्य तज्ज्ञ

कोरोनाचा वाढता संसर्ग पुन्हा एकदा जगासाठी डोकेदुखी ठरत आहे, अनेक देशात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. इतकंच नाही तर भारतात देखील कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडल्याने खळबळ उडाली आहे. काही राज्यांमध्ये सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. महाराष्ट्रातही कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला आहे.

Corona : पुन्हा मास्क घालण्याची वेळ आलीये का? पाहा काय म्हणताय आरोग्य तज्ज्ञ
corona
| Updated on: Dec 21, 2023 | 3:15 PM

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढले आहे. कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात एकूण 358 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे, त्यापैकी 300 प्रकरणे एकट्या केरळमध्ये आहेत. कोरोनामुळे देशात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात कोविडची 2,669 सक्रिय प्रकरणे आहेत. बुधवारी नोंदवलेले 614 दैनंदिन प्रकरणे मे महिन्यानंतरचे सर्वाधिक आहेत, त्यामुळे धोका लक्षणीय वाढला आहे. कोरोनाच्या नवीन सब-व्हेरियंट JN.1 मुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

जागतिक आरोग्य संघटना डब्लुएचओने या नवीन प्रकाराला JN.1 असे नाव दिले आहे. हा ओमायक्रॉन व्हायरसचा सब व्हेरिएंट आहे. सध्या याचा कोणताही मोठा धोका नसल्याचं म्हटलं जात आहे. हिवाळा सुरू झाल्याने आणि JN.1 मुळे अनेक देशांमध्ये संसर्ग वाढल्याचे WHO ने म्हटले आहे.

आधीच आजारी असलेल्या लोकांना धोका

WHO च्या माजी मुख्य शास्त्रज्ञ, डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी माहिती दिली की, कोविडला सामान्य सर्दी समजू नका. जे लोक गंभीर आजारी आहेत त्यांना जास्त धोका असतो. यामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात आणि मानसिक आरोग्यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कोरोनाचा हा नवीन प्रकार अधिक संसर्ग वाढवणारा असला तरी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येत नाहीये. भारतात कोरोना लसीकरणानंतर लोकांना नवीन विषाणूचा धोका कमी आहे.

कोरोनाबाबत खबरदारी घेण्याचा सल्ला

2020 मधील कोरोनाची पहिली लाट आणि 2021 मधील घातक डेल्टा प्रकारामुळे भारताच्या आरोग्य यंत्रणेत लक्षणीय सुधारणा झाली आहे.  कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी देश सज्ज झाला आहे. डॉ.स्वामिनाथन यांनी लोकांना कोरोनाबाबत खबरदारी घेण्यावर भर दिला. वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांनी मास्क घालण्याचा सल्ला ही त्यांनी दिला आहे.