Elgar Prishad : एल्गार परिषद प्रकरण : वरवरा राव यांची जामीनासाठी सुप्रीम कोर्टात धाव, अपिलावर 11 जुलै रोजी सुनावणी

| Updated on: Jun 30, 2022 | 9:56 PM

आरोपीला जोपर्यंत कथित गुन्ह्यात दोषी नाही, असे घोषित केले जात नाही, तोपर्यंत गुन्ह्याचे गांभीर्य कायम राहील. या प्रकरणात आरोपी वरवरा राव यांची भूमिका गंभीर आहे. ते मुख्य सूत्रधारांपैकी एक आहेत. त्यामुळे आमच्या मते वैद्यकीय कारणास्तव आरोपीला जामीन मिळवण्याचा अधिकार नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते.

Elgar Prishad : एल्गार परिषद प्रकरण : वरवरा राव यांची जामीनासाठी सुप्रीम कोर्टात धाव, अपिलावर 11 जुलै रोजी सुनावणी
वरवरा राव यांची जामीनासाठी सुप्रीम कोर्टात धाव
Image Credit source: TV9
Follow us on

नवी दिल्ली : एल्गार परिषदेतील आरोपी तेलगू कवी वरवरा राव (Varvara Rao) यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच त्यांचा जामीन अर्ज (Bail Application) फेटाळून लावला. त्या निकालाला वरवरा राव यांनी सर्वोच्च न्यायालया (Supreme Court)त आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जेबी पार्डीवाला यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर वरवरा राव यांच्या वतीने वकील आनंद ग्रोव्हर यांनी अपील दाखल केले आहे. त्यांच्या अपिलावर लवकरच सुनावणी घेण्याची विंनती अ‍ॅड. ग्रोव्हर यांनी केली. या विनंतीची दखल घेत न्यायालयाने राव यांच्या अपिलावर 11 जुलै रोजी सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे.

मुंबईहून हैदराबादला जाण्यास नाकारली होती परवानगी

82 वर्षीय वरवरा राव यांनी जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र न्यायमूर्ती एस.बी. शुक्रे आणि न्यायमूर्ती जी.ए. सानप यांच्या खंडपीठाने एप्रिलमध्ये त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. मुंबईतील खर्च परवडत नसून अशा परिस्थितीत मला मुंबईहून हैदराबादला जाण्याची परवानगी देण्यात यावी, असाही अर्ज वरवरा राव यांनी केला होता. उच्च न्यायालयाने त्यांचा हा अर्ज देखील फेटाळून लावला होता. तथापि, त्याच्या प्रलंबित वैद्यकीय उपचारांमुळे न्यायालयाने त्यांचा तात्पुरता जामीन आणखी तीन महिन्यांसाठी वाढविला होता. याचवेळी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी आणखी काही वेळ दिला होता. त्यामुळे न्यायालयाने राव यांना पुन्हा तुरुंगात आत्मसमर्पण करण्यास वेळ दिला होता. तळोजा तुरुंगात असताना राव यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना 2021 मध्ये तात्पुरता वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आला होता.

मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलेली निरीक्षणे

आरोपींची तपासणी करणार्‍या सर्व तज्ञ वैद्यकीय अधिकार्‍यांनी एनआयएच्या प्रभावाखाली काम केले आहे, असा निष्कर्ष काढण्यासाठी आम्हाला काही पुरावे आढळलेले नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले होते. आरोपीला जोपर्यंत कथित गुन्ह्यात दोषी नाही, असे घोषित केले जात नाही, तोपर्यंत गुन्ह्याचे गांभीर्य कायम राहील. या प्रकरणात आरोपी वरवरा राव यांची भूमिका गंभीर आहे. ते मुख्य सूत्रधारांपैकी एक आहेत. त्यामुळे आमच्या मते वैद्यकीय कारणास्तव आरोपीला जामीन मिळवण्याचा अधिकार नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते. (Elgar Council accused Varvara Rao appeals to Supreme Court for bail)

हे सुद्धा वाचा