
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारताने घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर पाकिस्तानच्या मनात चांगलीच भीती निर्माण झाली आहे. भारताने केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानकडून ‘कॉपी पेस्ट’ कारवाई करण्यात आली. पंजाबमधील अमृतसरमधील अटारी, हुसैनीवाला आणि सादकी बॉर्डरवर दीर्घकाळ चालणाऱ्या रिट्रीट सेरेमनीत अनेक बदल करण्यात आले. त्याची एक झलक आज दिसून आली. अटारी बॉर्डरवर न गेट उघडले, न सैनिकांमध्ये हस्तांदोलन झाले. बीएसएफने याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एकीकडे शांतता आणि दुसरीकडे दहशतवादी कारवाया एकाच वेळी चालू शकत नाहीत.
अटारी रिट्रीट समारंभात पहिल्यांदाच दरवाजे उघडले गेले नाहीत. बीएसएफ आणि पाक रेंजर्सनी हस्तांदोलन केले नाही. त्यापूर्वी, बीएसएफ पंजाब फ्रंटियरने एक्स वर एक पोस्ट केली होती. त्यामध्ये म्हटले की, पंजाबमधील अटारी येथील पहलगाम येथे झालेल्या अलीकडील दुःखद दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंजाबमधील अटारी, हुसैनीवाला आणि सादकी सीमेवर होणाऱ्या रिट्रीट सेरेमनी रद्द करण्यात आले. आज जो सेरेमनी झाला त्यात दोन्ही देशांनी गेट न उघडताच राष्ट्रध्वज उतरवला.
भारतीय गार्ड कमांडर आणि पाकिस्तानच्या समकक्ष गार्ड कमांडर दरम्यान प्रतीकात्मक हस्तांदोलन रद्द झाले. सेरेमनी दरम्यान गेट बंदच राहिले. हे पाऊल सीमेपलीकडून करण्यात येणाऱ्या दहशतवादी कारवायांसंदर्भात असलेली चिंता म्हणून उचलण्यात आले आहे. शांतता आणि दहशतवाद सोबत चालू शकत नाही, हा संदेश त्यातून भारताने दिला.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने उचललेल्या पावलांमुळे पाकिस्तान घाबरला आहे. पाकिस्तानने म्हटले की, भारताने आमच्यावर एकतर्फी कारवाई केली. हा प्रकार बेकायदेशीर आहे. सिंधु नदीचे पाणी बंद करणे हा प्रकार युद्धासारखा आहे. आम्हीसुद्धा भारतासाठी एअरस्पेस बंद केला आहे. भारताने अटारी बॉर्डर बंद केली. आम्हीसुद्धा वाघा बॉर्डर बंद केली. सिंधु करार रद्द केल्यानंतर आम्ही सुद्धा शिमला कराराचा फेरविचार करु शकतो.